
जम्मू आणि कश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूरदरम्यान सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात शहीद झालेल्या सैनिकाच्या नातेवाईकांना पूर्ण लाभ नाकारल्याने अग्निवीरच्या आईने हायकोर्टात धाव घेतली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. त्यादरम्यान पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात होते. या हल्ल्यात 9 मे रोजी पूंछ येथे मुरली नाईक हे शहीद झाले. त्यांच्या मृत्यूनंतरदेखील त्यांना नियमित सैनिकांप्रमाणे लाभ देण्यात न आल्याने मुरली यांच्या मातोश्री ज्योतिबाई नाईक यांनी हायकोर्टात अॅड. संदेश मोरे, अॅड. हेमंत घाडीगावकर व अॅड. हितेंद्र गांधी यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. अग्निपथ योजना अग्निवीर आणि नियमित सैनिकांमध्ये ‘मनमानी’ भेदभाव निर्माण करते असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
अग्निपथ योजनेत अग्निवीरांना सेवोत्तर पेन्शन लाभ आणि सामान्यतः नियमित सैनिकांना मिळणाऱ्या इतर दीर्घकालीन कल्याणकारी हक्कांपासून स्पष्टपणे वगळण्यात आले असून शहीद अग्निवीराच्या पुटुंबाला सुमारे एक कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान रक्कम मिळते, परंतु त्यांना नियमित पुटुंब पेन्शन किंवा इतर कोणतेही फायदे दिले जात नसल्याचा दावा केला आहे. अग्निवीरांच्या पुटुंबीयांना पेन्शन, संस्थात्मक मान्यता आणि कल्याणकारी उपाययोजनांसह समान मरणोत्तर लाभ सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली असून या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.


























































