
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुणीतरी सांगितले पाहिजे की महाराष्ट्रामध्ये इतक्या वेळेस ते आले आणि पारदर्शक कारभाराच्या नावाने त्यांनी मते मागितली आहेत. महाराष्ट्र सरकारकडून मोदी यांची फसवणूक सुरू आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले.
आमच्यावर जर कोणी आरोप करत असेल की, आमच्याकडे पैसे नाहीत, तर हो हे खरं आहे. आमच्याकडे काळा पैसा नाहीच आहे. आम्ही पैसे वाटून जिंकून आलेलो नाही. आम्ही मायबाप जनतेच्या सेवेसाठी इथे आलो आहोत. पैशांचा खेळ करायला इथे आलेलो नाही. कारण हा व्यवहार नाही, तर हे राजकारण आहे. जर राजकारणात पैशांचा गैरवापर करून लोक जर निवडून येत असतील आणि त्याचा सत्तेतील लोकांना सार्थ अभिमान असेल तर हे कुठल्याही लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे हा विषय मी संसदेत मांडणार आहे, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केली.
निवडणुका पुढे का ढकलल्या असतील? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, निवडणुका पुढे का गेल्या मला माहित नाही. पण एका गोष्टीचं वारंवार चित्र दिसत आहे की, या निवडणुकीत पैशांचा गैरवापर मतांसाठी होत आहे, ते लोकशाहीसाठी हानिकारक असून चुकीचं आहे. त्यामुळे माझी निवडणूक आयोगाला हात जोडून विनंती आहे की, आतातरी जागे व्हा आणि कुठेतरी या सर्व गोष्टी बंद करा.
तसेच मला जर विचारले तर ही निवडणूक पूर्णपणे रद्द झाली पाहिजे. कारण या निवडणुकीत भरपूर घोळ आहे. जे निवडून आले आहे, ते कसे निवडून आले? तुम्हाला सर्वांना माहित आहे, कॉपी करून पास झाल्यावर बोर्ड काय कारवाई करतो, तसं कॉपी करून पास होणाऱ्या या नेतृत्वाकडे लोक कोणत्या नजरेने बघणार? हे नेतृत्व पुढील पाच वर्षे कसं काम करणार? मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, एका सशक्त लोकशाहीसाठी हे सर्व अतिशय घातक आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
निवडणूक प्रक्रियेमध्ये पैशाचा होणारा गैरवापर, सत्तेचा होणारा गैरवापर, उमेदवारी अर्ज दाखल न करुण घेणे हा जो विस्कळितपणा आणि गोंधळ महाराष्ट्रात यापूर्वी कधीच झाला नाही. हे आपले दुर्देव आहे की एवढं मोठे बहुमत या सरकारला दिले आहे. निवडणूक आयोगाबद्दल सर्वच जण विरोधात बोलत आहेत, त्या म्हणाल्या.



























































