
लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर रत्नेश्वर देवस्थानात वारकरी संप्रदायाचे प्राण मानले जाणारे संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज, संत जनाबाई यांच्यासह सात संतांच्या पवित्र पादुकांचे आज पुजन करण्यात आले. यावेळी सिध्देश्वर मंदीर परिसरात माऊलीच्या जयघोषाने दुमदुमुन गेला होता. या पादुका पुजनप्रसंगी मंदीर परिसरात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.
या सोहळ्यात मंदीर परिसरात असंख्य वारकरी व भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पादुका पुजनास ह.भ.प. छोटे कदम माऊली, देवस्थानचे प्रशासक सचिन जांबूतकर, जिल्हा पोलिस अधिक्षक अमोल तांबे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नºहे, मनपा उपायुक्त पंजाबराव खानसुळे, नायब तहसीलदार सुधीर देशमुख यांच्यासह मंदीराचे विश्वस्त यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज शष्टशतकोत्तर अमृत महोत्सवी संजिवनी समाधी सांगता, श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर जन्मोत्सव सांगता सोहळा आणि जगद्गुरु तुकाराम महाराज त्रिशकतोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठगमन सांगता सोहळ्यानिमित्त लातूरात वारकऱ्यांचा मेळा भरला आहे.
या निमित्ताने संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज व संत जनाबाई यांच्या पादुकांचे आगमन शनिवार (२१ ) हेलिकॉप्टरने झाले. सर्वप्रथम या पादुका लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर मंदिरात दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास आल्या. यानिमित्ताने या पादुकांचे पुजन देवस्थानच्या वतीने करून महाआरती करण्यात आली. पादुकांचे पुजन होत असताना मंदीर परिसरात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. सदर सोहळ्यासाठी लातूर शहरासह जिल्हाभरात वारकरी संप्रदायातील वारकरी भक्त व शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सदर पादुकांचे स्वागत करण्यासाठी मंदीर परिसर आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. पादुकांचे आगमन मंदीरात होताच पादुकांवर पुष्पवृष्टी करण्यासाठी अनेक महिला पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होत्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा केलेले लहान मुलेही यात सहभागी झाली होती. पादुकांचे पुजन झाल्यानंतर श्री सिध्देश्वराची महाआरती करण्यात आली.
हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी सिध्देश्वर मंदीराचे विश्वस्त अशोक भोसले, रमेशसिंह बिसेन, व्यंकटेश हालिंगे, विशाल झांबरे, ओम गोपे आदींसह देवस्थानचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसह भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. या सोहळ्यादरम्यान पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.





























































