
अवतरण अकादमी मुंबई यासंस्थेच्या वतीने रत्नागिरीतील रंगकर्मी राजेश गोसावी यांना नाट्यगुरु डॉ. कृ. रा. सावंत नाट्यव्रती अवतरण सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख अकरा हजार रुपये, मानपत्र, मानचिन्ह आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २६ मार्च रोजी मुंबई येथे अवतरण अकादमीच्या ‘जागतिक नाटक दिवस’या सोहळ्यात पुरस्कार वितरण होणार आहे.
संस्कृती फाउंडेशन लांजा रत्नागिरीचे संस्थापक, लेखक दिग्दर्शक अभिनेता राजेश गोसावी अशी ओळख असणाऱ्या राजेश गोसावी यांनी लांजा सारख्या ग्रामीण भागात सांस्कृतिक चळवळ राबवली आहे. काही मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. रंग भरू दे आमुच्या गणा हे स्थानिक कलाकारांना घेऊन या नाटकाचे प्रयोग मुंबईसह कोकणात त्यांनी केले आहेत. २००७ सालापासून ते नाट्य आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. ते प्राथमिक शिक्षक आहेत.
राजेश गोसावी यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल संस्कृती फाउंडेशन लांजा रत्नागिरीचे अध्यक्ष गौतम कांबळे, उपाध्यक्ष संतोष म्हेत्रे, सचिव विनोद बेनकर संघटक सिद्धेश पांचाळ, संघटक प्रियवंदा जेधे यांच्यासह समस्त नाट्यकर्मीनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


























































