मुंबईत रेल्वे अपघात होतायत आणि ‘रीलमंत्री’ फक्त बुलेट ट्रेनवर लक्ष देतायत; आदित्य ठाकरे यांची टीका

‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी रेल्वेवर अपघाती मृत्यूचे सत्र सुरूच आहे. या दरम्यानच एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मुंबईत रेल्वे अपघातात गेल्या 11 वर्षात 29970 प्रवाशांचे मृत्यू झाले आहेत. त्यावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी रेल्वे मंत्री अश्विणी वैष्णव यांना फटकारले आहे.

”मुंबईत रेल्वे अपघात होत असताना रील मंत्री बुलेट ट्रेनवर लक्ष देतायत. या बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काहीही उपयोग नाही. बुलेट ट्रेनसाठी BKC मधली मोक्याची जागा फुकटात घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातलं आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र देखील हिसकावून घेण्यात आले. या सर्व खर्चांपेक्षा मुंबई लोकल ट्रेनच्या सुधारणांवर पैसा खर्च करायला हवा, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

रेल्वे अपघातांतील मृत्यू

मध्य रेल्वे मार्ग – 29,321 मृत्यू (2009 ते जून 2024)
पश्चिम रेल्वे मार्ग – 22,481 मृत्यू, 26,572 जखमी (2005 ते जुलै 2024)

मागील 20 वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 51 हजारांहून अधिक प्रवाशांचा हकनाक बळी गेला.