पावसामुळे विद्यार्थ्यांचे हाल; MPSC परीक्षा पुढे ढकला, अंबादास दानवे यांची मागणी

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरपरिस्थितीमुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. ही परीक्षा 27 ते 29 मे 2025 या सलग तीन दिवसांत होणार आहे.

X वर एक पोस्ट करत अंबादास दानवे म्हणाले आहेत की, या परीक्षा पुढे ढकलणे विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरेल. जीवावर उदार होऊन विद्यार्थ्यांनी परीक्षेला येणे सरकार कसे अपेक्षित करू शकते? दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटलं आहे की, “उद्या, परवा आणि तेरवा अशा सलग तीन दिवसांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचे ट्रेन, एसटी बसमधून फोन येत आहेत की, ते रस्त्यातच अडकले आहेत. ते उद्या परीक्षा केंद्रावरही पोहचू शकत नाहीत. जर ते परीक्षा केंद्रावर पोहचू शकले नाहीत तर त्यांची मागील कित्येक वर्षांची तयारी अशीच वाया जाईल. या नैसर्गिक आपत्तीचा विचार करता, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्वरीत निर्णय घेऊन आगामी तीन दिवसांत होऊ घातलेल्या या परीक्षा स्थगित करून पुढे योग्य त्या दिवसांत या परीक्षा घ्याव्यात, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी ही मागणी करीत आहेत.”