
एकाच जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या 60 कर्मचाऱ्यांच्या बदल्या एपीएमसी प्रशासनाने अखेर रद्द केल्या आहेत. या बदल्या रद्द करण्यासाठी संचालक मंडळाने एपीएमसीचे सचिव पी. एल. खंडागळे यांच्यावर प्रचंड दबाव आणला होता. त्यामुळे त्यांच्यावर हे बदल्यांचे आदेश मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे. एपीएमसीच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई एपीएमसी मार्केटचे सचिव पी. एल. खंडागळे यांनी महिनाभरापूर्वी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या होलसेल बदल्या केल्या होत्या. फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा, भुसार आणि मसाला मार्केटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयात आणले तर मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना या पाचही मार्केटमध्ये पाठवले. त्यापैकी ज्यांच्या बदल्या मुख्यालयातून मार्केटमध्ये झाल्या आहेत त्यांनी लगेच आपला पदभार स्वीकारला. मात्र मार्केटमधून मुख्यालयात बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी जाण्यास आढेवेढे घेतले आहेत. अनेक जण या बदल्यांमुळे दुखावले गेले. या दुखावलेल्यांची संचालक मंडळाने पाठराखण केली. दोन सभांमध्ये संचालक मंडळाने बदल्या रद्द करण्यासाठी सचिवांवर प्रचंड दबाव आणला. त्यानंतर सचिवांनी सोमवारी या बदल्या रद्द करण्याचे आदेश काढले.
एकदम झालेल्या प्रक्रियेला विरोध
एपीएमसीचे सचिव पी. एल. खंडागळे यांनी एकदम राबविलेल्या बदली प्रक्रियेला संचालक मंडळाने विरोध केला आहे. इतक्या कर्मचाऱ्यांच्या एकदम बदल्या करण्याऐवजी त्या टप्प्याटप्प्याने करण्यात यावेत, असे प्रशासनाला सुचवण्यात आले आहे. त्यानुसार यापुढे बदल्यांची प्रक्रिया सचिवांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे, अशी प्रतिक्रिया एपीएमसीचे अध्यक्ष प्रभू पाटील यांनी व्यक्त केली आहे.