लेख – बलुचिस्तान, सिंध आणि अफगाणिस्तान

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

पाकिस्तानवर सामरिक दबाव टाकण्यामध्ये आपल्याला यश मिळत आहे. पाकिस्तान सध्याच्या घडीला चारही बाजूंनी संकटात सापडला आहे. मात्र पाकिस्तान,चीन आणि त्यांच्या समर्थकांबरोबरची लढाई अनेक वर्षे चालणार आहे हे अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ सध्या सुरूच आहे. भारत पाकिस्तानला तीन आघाड्यांवर युद्ध लढण्यास भाग पाडत आहे.

अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करून त्यांचे मोठे नुकसान करत आहे. (TTP)ला नियंत्रित करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य तोफखाना, हेलिकॉप्टर, गनशिप्स आणि क्षेपणास्त्रांचा वापर करत आहे. 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या 366 दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकूण 1360 लोकांचा बळी गेला आहे. त्यामध्ये 210 नागरिक, 429 सैनिक आणि 731 स्वतंत्र सैनिकांचा समावेश आहे. जवळपास 40 ते 50 टक्के पाकिस्तानी सैन्य दहशतवादविरोधी अभियानामध्ये गुंतलेले आहे.

पाकिस्तानच्या आत बलुचिस्तानमध्येही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे (BLA) हल्ले अधिक तीव्र झाले आहेत. बलुचिस्तान प्रांतातील खुजदार जिह्यात बुधवारी 21 मे रोजी शाळेच्या बसवर आत्मघातकी कार बॉम्बरकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, 38 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू झाल्यानंतर बलुचिस्तानच्या बंडखोरांनी स्वातंत्र्याची घोषणा केली. बलूच नेते मीर यार बलूच यांनी ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’च्या निर्मितीची घोषणा करीत हा नवीन देश पाकिस्तानपासून फारकत घेत असल्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे, तर बलूच संघटनेने दिल्लीत स्वतंत्र उच्चायुक्तालय सुरू करण्याची मागणी केली आहे. जागतिक पटलावर भारतासह अन्य देशांनी आपल्याला साथ द्यावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मीर यार बलूच हे स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढणाऱ्या ‘बलूच लिबरेशन आर्मी’चे नेतृत्वही करीत आहेत. संयुक्त राष्ट्रांनी त्यांची शांती सेना बलुचिस्तानमध्ये पाठवावी आणि पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्या नवीन सीमेच्या आतच राहण्यास सांगावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. हे सर्व साध्य होणे कठीण दिसते, पण बलूच समाजाचा स्वातंत्र्यासाठीच्या प्रभावी लढय़ाचा इतिहास खूप जुना आहे. बलूच पराक्रमी आणि लढवय्ये मानले जातात. ‘बलूच लिबरेशन आर्मी’ने पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला केला आणि त्यांना माघार घेण्यास आणि क्वेटा सोडण्यास भाग पाडले. 2025च्या मार्च महिन्यात पाकिस्तानमध्ये बलूच बंडखोरांनी एका ट्रेनचे अपहरण करून प्रवाशांना सुमारे 36 तास ओलीस ठेवले होते.

1947 साल भारताची फाळणी करण्यात आली आणि भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश निर्माण करण्यात आले. बलूच लोकांची इच्छा नसतानाही बलूचबहुल प्रदेश पाकिस्तानमध्ये सामील करण्यात आला. तेव्हापासून स्वतंत्र होण्यासाठी बलूच लोकांचा पाकिस्तान शासनाशी सतत संघर्ष सुरू आहे.

आज बलुचिस्तान प्रांतात ग्वादर बंदर उभारून चीनने त्या बंदराचा आणि परिसराचा ताबा घेतला आहे. त्यामुळे बलूच जनतेचा संताप द्विगुणित झाला आहे. चीनने काराकोरम खिंडीतून ग्वादर बंदरापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू केले आहे. ग्वादर बंदरापर्यंत रेल्वे आणि तिथेच विमानतळ ही अशी प्रचंड कामेही चीनने आपल्या हाती घेतली आहेत. हा चीनचा आपल्या भागातला प्रवेश जाणून बलूच जनता ही कामे पार पडू नयेत यासाठी सतत अडथळे निर्माण करीत असते. आता या रस्त्याच्या कामावर असलेल्या चिनी कामगारांच्या संरक्षणाची जबाबदारी पाकिस्तानच्या लष्कराकडे आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर विरुद्ध बलूच जनता हा संघर्ष रोजचा झाला आहे. ग्वादर बंदर बांधून पूर्ण तयार झाले की, चिनी मालाला या बंदरातून अरबी समुद्रामार्गे अमेरिकेत, दक्षिण अमेरिकेत, आफ्रिकेत प्रवेश करण्याचा राजमार्ग उपलब्ध होईल आणि सध्या चीनला जो लांबचा फेरा पडतो तो पडणार नाही.

‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू होताच बलूच बंडखोरांनी भारताला निरोप पाठविला होता की, आम्ही आमच्या भागातून संघर्षाला प्रारंभ करीत आहोत. दुसऱ्या बाजूने तुम्ही अशीच मोहीम सुरू करा. बलुचिस्तानने पाकिस्तानचा 48 टक्के भूभाग व्यापला आहे. क्वेटा ही बलुचिस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

बलुचिस्तान पाकिस्तानमधून बाहेर पडला तर पाकिस्तान पांगळे होईल. पख्तुनबहुल प्रदेशालाही पाकिस्तानमधून फुटून बाहेर पडायचे आहे. सिंध प्रांतातही हीच भावना आहे. मग उरतो फक्त पंजाबी पंजाब!

एकीकडे बलुचिस्तानात अस्थिरता निर्माण झालेली असताना दुसरीकडे सिंध प्रांत पेटला आहे. सिंधमधील जनता वादग्रस्त कालव्याच्या प्रकल्पाविरोधात रस्त्यावर उतरली आहे. आंदोलकांनी सिंधचे गृहमंत्री जियाऊल हसन लंजर यांच्या घराला आग लावली. आंदोलकांनी लंजर यांच्या मालमत्तेचं नुकसान केलं. या वेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. यामध्ये दोन आंदोलकांचा मृत्यू झाला. या संघर्षात एक डीसीपी आणि सहा पोलीस कर्मचारी यांच्यासह 10 नागरिक जखमी झाले. शाहबाज सरकार चोलिस्तान वाळवंटात सिंचनासाठी सिंधू नदीतून सहा कालवे काढण्याच्या तयारीत होतं, पण पीपीपी आणि सिंध प्रांतातील अन्य राजकीय पक्ष या प्रकल्पाच्या विरोधात आहेत. या प्रकल्पाला सिंधमधून प्रचंड विरोध होत आहे. संपूर्ण सिंध प्रांतात धरणं आंदोलन सुरू आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील मुख्यालयावर 2006 मध्ये बॉम्बस्पह्ट हल्ल्याचा कट रचणारा खतरनाक दहशतवादी अबू सैफुल्लाह याचा पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांनी खात्मा केला आहे. सैफुल्लाह याला पाकिस्तानकडून संरक्षण देण्यात आलं होतं. अबू सैफुल्लाहच्या हत्येने पाकिस्तानात दहशतवाद्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

पाकिस्तानवर सामरिक दबाव टाकण्यामध्ये आपल्याला यश मिळत आहे. पाकिस्तान सध्याच्या घडीला चारही बाजूंनी संकटात सापडला आहे. मात्र पाकिस्तान,चीन आणि त्यांच्या समर्थकांबरोबरची लढाई अनेक वर्षे चालणार आहे हे अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ सध्या सुरूच आहे. भारत पाकिस्तानला तीन आघाडय़ांवर युद्ध लढण्यास भाग पाडत आहे.