लेख : शिवराज्याभिषेक – एका नव्या युगाचा आरंभ

>> विलास पंढरी

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 रोजी रायगडावर झालेला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा एका नव्या युगाचा आरंभ होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक केला होता. या तारखेला त्यांनी ‘राज्याभिषेक शक’ नावाची नवी कालगणना सुरू केली. त्यानुसार यंदा म्हणजे 2025मध्ये 351 वर्षे पूर्ण होतात. इंग्रजी तारखेनुसार अधिकृतरीत्या दरवर्षी 6 जूनला किल्ले रायगडावर आणि महाराष्ट्रभर हर्षोल्हासात हा सोहळा साजरा केला जातो.

छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन 8व्या शतकापासून स्वदेशहित व हिंदू धर्मरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रतिकाराचा परमोच्च बिंदू ठरला. 17व्या शतकातील भारतातील राजकीय, धार्मिक व सामाजिक परिस्थिती, राज्याभिषेकाची गरज, त्याचे तत्कालीन भारतातील महत्त्व व त्याचे झालेले दूरगामी परिणाम असा हा प्रचंड मोठा विषय आहे.

शिवाजी महाराज शिवछत्रपती झाले तो दिवस होता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 आणि विक्रम संवत 1730. शिव शकही याच दिवशी सुरू झाले. या कालगणनेनुसार यंदा इसवी सन 2025, श्रीशालिवाहन शके 1947, विक्रम संवत 2082 असून शिवराज शक 351 आहे. म्हणजेच आज या ऐतिहासिक स्फूर्तिदायी घटनेला 351 वर्ष झाली आहेत.

यानिमित्ताने साडेतीनशे वर्षांपूर्वी हा ऐतिहासिक सोहोळा कसा झाला होता हे पाहणे उद्बेधक ठरेल.

मराठी तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1932ला रायगडावर सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला आणि हिंदवी मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. तमाम मराठी समाजासाठी ही महत्त्वाची घटना होती.

शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने चालू होती. राज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणतीही ज्ञात परंपरा नसल्याने प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून शिवराज्याभिषेकासाठी काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास करून माहिती जमा केली. यात प्रामुख्याने गागा भट्ट यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातून लोकांना आमंत्रण देण्यात आले होते. समारंभासाठी जवळपास लाखभर लोक रायगडावर जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित होते. रोज एक धार्मिक विधी केला जात असे.

बाहेर पडण्यापूर्वी राजांनी सर्वप्रथम राजमाता जिजाऊंना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले व त्यानंतर विविध मंदिरांत जाऊन देवदर्शन केले. ते रायगडाला 12 मे 1674ला परत आले. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नसल्याने चार दिवसांनी ते प्रतापगडावरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमाता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्या वेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. महाराजांनी 28 मे रोजी प्रायश्चित्त केले व जानवे परिधान केले.

महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या.

6 जून 1674ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर स्नान करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. या वेळी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजांचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या आसनावर शिवाजी महाराज बसले. राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार 32 शकुन चिन्हांनी सजवलेले होते. 32 मण सोन्याचे त्या वेळी 14 लाख रुपये मूल्य असलेले भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. ब्राह्मणांनी मोठय़ा स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. ‘शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीची फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागा भट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ‘शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना याप्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्ने, वस्त्रs, शस्त्रs दान केली. हा सर्व विधी सकाळी आठ वाजेपर्यंत संपला. समारंभ संपल्यावर शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोडय़ावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडा घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्यजनांनी फुले, चुरमुरे, उधळले. दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले. हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्याचा नेत्रदीपक सोहोळा संपला.

शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ‘राज्याभिषेक शक’ ही स्वतःची नवीन कालगणना सुरू केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी मोडी व मराठी लिपीतील नाणी चलनात आणली. पूर्वीची मुघलकालीन पद्धतीची लेखनपद्धती बदलून हिंदू पद्धतीची लेखन पद्धती विकसित करून मराठी भाषा शुद्धीकरण सुरू केले. परकीयांच्या तावडीतून सोडविलेल्या गडकोट किल्ल्यांना पूर्वी असलेली मराठी नावे दिली. राज्याभिषेकानंतर परकीय सत्ताधीशाविरुद्ध आक्रमणे, मोहिमांचा धडाका लावला. त्यांची लढाई पूर्ण आशिया खंडातील एक नंबरवर असलेले शक्तिशाली मोगल सत्ताधीश, दक्षिणेतील आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्याबरोबरच गोव्यातील पोर्तुगीज, सुरतेत पाय रोवून बसलेले इंग्रज व फ्रेंच, जंजिऱ्याचा सिद्धी जौहार, कोकणातील छोटी छोटी राज्ये अशा सर्वांशी होती. आजच्या काळातील चोहोबाजूंनी अरब राष्ट्रांनी वेढलेल्या इस्राएलसारखी शिवाजी महाराजांची अवस्था होती. अर्थात शिवाजी महाराजांनी आपल्या या सगळ्या शत्रूंचा संपूर्ण शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्यांच्या बलस्थानाबरोबरच कच्च्या दुव्यांचाही विचार करून आपल्या कुशल नेतृत्वाखाली स्वराज्यासाठी वाहून घेतलेल्या मावळ्यांच्या मदतीने सर्व शत्रूंना नामोहरम करून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.