
>> दिलीप ठाकूर
दृश्य माध्यमाची दृष्टी व वैशिष्टय़े माहीत असलेला दिग्दर्शक आपल्या चित्रपटात एखादे गाव, एखादे शहर, इतकेच नव्हे तर एखादा सेटही व्यक्तिरेखा म्हणून रुपेरी पडद्यावर दाखवू शकतो. तात्पर्य, चित्रपटात फक्त आणि फक्त कलाकारच असतात असे नव्हे तर इतरही गोष्टींना महत्त्व असते.
एप्रिल मे 1999’ या चित्रपटात रायगड जिह्यातील मुरुड तालुक्यातील श्रीवर्धन गाव, तेथील निसर्ग, प्रसन्न समुद्रकिनारा हे सगळेच एखाद्या व्यक्तिरेखेनुसार मिसळले आहे. आपणही त्यात पटकन गुंतत जातो. अनेक चित्रपटांत अशी खासियत दिसते. ‘शोले’तील रामगढ गाव अगदी तसेच. बंगळुरूजवळील एका गावाजवळ लावलेला हा सेट खरे गाव वाटते.
‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटात जुन्या काळातील गोष्ट दाखवताना दक्षिण मध्य मुंबईतील सुखलाजी स्ट्रीट, त्या परिसरात देहविक्री करणाऱ्या स्त्रिया, आसपासची सिंगल क्रीन थिएटर्स या सगळ्याचा सेट व वातावरण असे काही बेमालूम उभारलेय की हे सगळेच या चित्रपटातील एक व्यक्तिरेखा ठरली आहे. ‘गली बॉय’ चित्रपटात धारावी अशीच दिसते. ‘काला’ चित्रपटातील रजनीकांत व नाना पाटेकर यांच्यावरील अनेक दृश्ये प्रत्यक्षात धारावीत चित्रित केलीत, ती या चित्रपटातील एक व्यक्तिरेखा ठरली.
‘कथा’ चित्रपटात मध्यमवर्गीय चाळ, ‘दिशा’ चित्रपटात गिरणगावातील गिरणी कामगारांचे राहणीमान हेही एक व्यक्तिरेखाच. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’मधील प्रेमाच्या गोष्टीत आपण रंगून जातो. पुनः पुन्हा ‘डीडीएलजे’ पाहताना लक्षात येते यात लंडन एक व्यक्तिरेखेनुसार आलेय. नुसतेच सवलती मिळतात म्हणून लंडनला शूटिंग झालेले चित्रपट अनेक, तर ‘हम आपके है कौन’मधील चकाचक घरदेखील व्यक्तिरेखाच असेच म्हणायला हवे. ‘एक दुजे के लिये’त गोव्यातील वातावरण, ‘जंगल’ चित्रपटात जंगल व्यक्तिरेखेनुसार येते. ‘पॉन्डेचरी’ या मराठी चित्रपटात पॉन्डेचरी हीच भूमिका बजावते. ‘पॉन्डेचरी’ हे एका मराठी चित्रपटाचे नाव का बरे असेल या प्रश्नाचे उत्तर हा चित्रपट पाहताना मिळत जाते. ‘व्हिक्टोरिया नंबर 203’ मधील घोडागाडी, ‘बॉम्बे टू गोवा’मध्ये बस, ‘द बर्निंग ट्रेन’मध्ये ट्रेन, ‘मन’ चित्रपटात जहाज यादेखील व्यक्तिरेखाच. ‘गाईड’मधील जोधपूर असेच.
‘देस परदेस’मध्ये देव आनंदला लंडन असेच एक व्यक्तिरेखा म्हणून दाखवायचे होते, पण आणीबाणीचा काळ असल्याने विदेशातील चित्रीकरणावर बंधने होती. तेव्हा कला दिग्दर्शक टी. के. देसाई यांनी वांद्रय़ातील मेहबूब स्टुडिओत लंडनचे रस्ते, वस्ती, पब यांचा सेट लावून दाद मिळवली. बासू चटर्जी यांच्या ‘पिया का घर’, ‘छोटीसी बात’ आणि मुजफ्फर अली दिग्दर्शित ‘गमन’ अशा अनेक चित्रपटांतून सत्तरच्या दशकातील मुंबई एका व्यक्तिरेखेनुसार दिसते. चित्रपट हे दृश्य माध्यम असल्याने त्यातील गोष्टीत भवताल हा एखाद्या व्यक्तिरेखेनुसार असावा अशी अपेक्षा ठेवण्यात काहीच गैर नाही. एखाद्या गोष्टीत तसा वाव असल्यास आणि मूळ पटकथाकाराने तसा दृष्टिकोन ठेवल्यास छायाचित्रणकार व संकलक यांना ते नक्कीच प्रभावीपणे पडद्यावर दाखवता येतात.
(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)