स्त्रीच्या आयुष्यातील कठीण टप्पा

>> डॉ. सुरभी सिद्धार्थ

रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील कठीण टप्प्यांपैकी एक आहे आणि प्रत्येक स्त्री या टप्प्यातून जाते. रजोनिवृत्तीच्या आधी, दरम्यान आणि नंतर आपले आरोग्य उत्तम राहणे अतिशय गरजेचे आहे. एक निरोगी जीवनशैली स्वीकारणे आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील एक असा काळ आहे, ज्यात तिची मासिक पाळी थांबते आणि तिचे अंडाशय प्रजनन कार्यक्षमता गमावतात. 45-55 वयोगटातील महिलांना रजोनिवृत्ती येऊ शकते.

पेरीमेनोपॉज म्हणजे काय?

स्त्रिया तिशी किंवा चाळीशीमध्ये असताना पेरीमेनोपॉजचा अनुभव घेऊ शकतात. जेव्हा अंडाशय अंडय़ांची निर्मिती थांबविते, शिवाय हे रजोनिवृत्तीपर्यंत टिकते. तुम्हाला माहीत आहे का? मासिक पाळीतील अनियमितता आणि तसेच शरीरातील अतिरिक्त उष्णता अशी रजोनिवृत्तीची लक्षणे दिसू शकतात. त्याचप्रमाणे रजोनिवृत्तीच्या काळात आणि नंतर महिलांना अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. त्या विक्षिप्त, उदास, तणावग्रस्त, निराश, चिंताग्रस्त दिसतात.

रजोनिवृत्तीनंतरच्या आरोग्य समस्याः वयाच्या 55 वर्षांपूर्वी पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना हृदयरोगाची शक्यता कमी असते. तुम्हाला माहीत आहे काय? एस्ट्रोजेन शरीराला चांगल्या आणि वाईट कोलेस्टेरॉलचे निरोगी संतुलन राखण्यास मदत करते तसेच रक्तवाहिन्या योग्य आणि खुल्या ठेवण्यास मदत करते. इस्ट्रोजेनशिवाय कोलेस्टेरॉल धमनीच्या भिंतींवर जमा होऊ शकते, ज्यामुळे हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. वयाच्या 70 व्या वर्षी स्त्रियांना हृदयरोगाचा धोका समान वयाच्या पुरुषांइतकाच असतो. रजोनिवृत्तीनंतर कमी इस्ट्रोजेन असण्याने अस्थिरोग होण्याचा धोका वाढून हाडांची खनिज घनता कमी होते हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. ही एक अशी स्थिती आहे, ज्यामुळे तुमची हाडे ठिसूळ, कमकुवत होतात आणि सहज तुटतात. या स्त्रियांमध्ये लघवीची असंयमतादेखील दिसून येते. इस्ट्रोजेनची कमी पातळी एखाद्याचा मूत्रमार्ग कमकुवत करू शकते. शिवाय, स्त्रियांना मौखिक आरोग्याच्या समस्यादेखील येऊ शकतात. रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये कोरडे तोंड आणि पोकळी वाढण्याचा धोका सामान्यतः दिसून येतो. त्यामुळे रजोनिवृत्तीनंतर निरोगी राहणे अत्यावश्यक आहे

फळे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश आणि आहारातील साखरेचे प्रमाण कमी करणे, धूम्रपान आणि अल्कोहोल टाळणे आवश्यक आहे. धूम्रपान हृदयरोगास आमंत्रण देऊ शकते आणि अल्कोहोल आपल्या यकृतावर परिणाम करते. मुळात निरोगी आहार घ्या, कमी चरबीयुक्त आहार, फायबरयुक्त पदार्थांचे सेवन अधिक करणे आवश्यक आहे. जंक फूड, तेलकट, प्रक्रिया केलेल्या आणि पॅकबंद पदार्थांना नाही म्हणा.

डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी तपासा. आपल्याला पुरेसे पॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मिळतेय का याची खात्री करा. व्हिटॅमिन डीचा दैनिक डोस मिळवण्यासाठी सकाळी किमान 30 मिनिटे स्वतःला सूर्यप्रकाशात उभे करा. दररोज व्यायाम करून इष्टतम वजन राखण्याचा प्रयत्न करा. पायऱया चढण्याचा प्रयत्न करा, नृत्य करा, सामर्थ्य प्रशिक्षण घ्या, कार्डिओ आणि पिलेट्सचा पर्याय निवडू शकता. योग किंवा ध्यान करून तणावमुक्त रहा.

(लेखिका मदरहूड हॉस्पिटल, खारघर येथे प्रसूती व स्त्रीरोगतज्ञ व सल्लागार आहेत)