
>> धीरज कुलकर्णी
काही प्रवासवर्णने प्रेक्षणीय स्थळे, प्रवासाची साधने, हवामान इत्यादी याच्या पलीकडे जाऊन, त्या काळाचा महत्त्वाचा दस्तऐवज होतात. तेथील समाजजीवन, इतिहास, रूढीपरंपरा, चालीरीती, राजकारण, पर्यावरण आदी घटक वाचकाला काही वेगळे व संपन्न वाचल्याचा अनुभव देतो. ज्येष्ठ संपादक व लेखक दिवंगत माधव गडकरी यांच्या 1974 साली प्रसिद्ध झालेल्या ‘असा हा गोमंतक’ या पुस्तकात त्या काळच्या गोव्याचे दर्शन घडते.
गोवा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतात सुंदर समुद्रकिनारे, देखणी चर्चेस, मंगेशी, शांतादुर्गेची मंदिरे, मांडवी नदीतील जलविहार आणि जागोजागी हुराक फेणीची बरसात करणारी टावराने. गोव्यातील पर्यटन देशविदेशात विशेष लोकप्रिय असून, गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाला महत्त्व आहे. आजच्या काळात स्मार्टफोनवर नेहमी आपल्याला गोव्याबद्दलचे व्हिडीओ व लेख पाहायला मिळतात. तसेच यापूर्वीच्या काळातही जुन्या लेखकांनी गोव्याबद्दल लिहून ठेवले आहेच.
प्रवासवर्णन हा साहित्यप्रकार मराठीत बऱयापैकी लोकप्रिय आहे. गोडसे भटजींच्या पुस्तकापासून ते या काळातील मीना प्रभू यांनी केलेल्या देशविदेशाच्या वर्णनामुळे वाचकांना जणू घरबसल्या पर्यटनाचा आनंद मिळाला. मराठी माणसात पर्यटनाचे प्रमाणही गेल्या दशकात बरेच वाढले आहे. विविध ठिकाणी गेल्यानंतर तिथले अनुभव लोक आपापल्या सोशल मीडिया पेजवर सांगतात. हे लोक साहित्यिक नाहीत, सामान्य माणसे आहेत. त्यांच्या पर्यटनाच्या अनुभवात वेगवेगळ्या ठिकाणची प्रेक्षणीय स्थळे, प्रवासाची साधने, हवामान इत्यादी सामान्यत सर्व वर्णनात आढळणारे घटक असतात.
मात्र, काही प्रवासवर्णने ही यापलीकडे जाऊन, त्या काळाचा महत्त्वाचा दस्तऐवज होतात. एखाद्या ठिकाणच्या वर्णनात, तेथील समाजजीवन, इतिहास, रुढीपरंपरा, चालीरीती, राजकारण, पर्यावरण आदी घटक आल्यास वाचकाला काही वेगळे व संपन्न वाचल्याचा अनुभव मिळतो. ज्येष्ठ संपादक व लेखक दिवंगत माधव गडकरी हे कामानिमित्त काही काळ गोव्यात राहायला होते. हा काळ आजपासून साठेक वर्षांपूर्वीचा. या काळात त्यांनी गोव्यात भरपूर भ्रमंती केली. माहिती गोळा केली. अनेक संदर्भग्रंथ धुंडाळले. लोकांमध्ये मिसळून त्यांचे जीवन जवळून पाहिले. गोव्याच्या ते प्रेमातच पडले. 1974 ला प्रसिद्ध झालेल्या ‘असा हा गोमंतक’ या माधव गडकरी यांच्या पुस्तकात त्याकाळच्या गोव्याचे बरेचसे यथार्थ दर्शन घडते. या वर्णनात सर्वच समाविष्ट करणे शक्य नाही. हे प्रस्तावनेत गडकरींनी मान्यही केले. या पुस्तकाचा पुढील भाग काढण्यास ते उत्सुक होते, पण ते होऊ शकले नाही. मात्र ज्याचा समावेश केलाय त्याची इत्यंभूत माहिती दिली असल्याने वाचकाला गोव्याची उत्तम माहिती कळते.
आजच्या काळातही 2023 साली मॅजेस्टिक प्रकाशनाने याची नवी आवृत्ती प्रकाशित केली, यातच पुस्तकाचे महत्त्व समजू शकते. माणूस उत्सवप्रिय प्राणी. भारतात सर्वच ठिकाणी अनेक प्रकारचे उत्सव साजरे होत असतात. त्यातही कोकणातील, गोव्यातील माणसाला उत्सव अधिकच प्रिय.
गडकरींना गोवा पाहताना अनेक देवस्थाने दिसली. स्वत ते फारसे धार्मिक नसतानाही या स्थानांकडे ते आकर्षित झाले. तिथल्या देवतांचा इतिहास जाणला, त्यांच्याबद्दलचा सुरस लोककथा नोंदवून ठेवल्या. तिथे साजरे होणारे सण, त्यातील चालीरीती यांची नीट माहिती वाचकांना त्यातून मिळते. तसेच मंदिराची स्थापत्यशैली समजते.
गोव्यात शिमगा जितक्या उत्साहात साजरा केला जातो, तितक्याच उत्साहात गोव्याचा कार्निव्हलसुद्धा साजरा होतो. या दोहोंची इत्यंभूत माहिती आपल्याला यातून कळते. कला, साहित्य, संगीत या क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे अनेक कलाकार गोव्याचे. संगीततज्ञ व लेखक स्नेही गोपालकृष्ण भोबे यांच्यामुळे अनेक कलाकारांचा इतिहास व माहिती गडकरींना गोळा करता आली. नाटय़ गंगोत्रीच्या प्रवाहात या लेखात अनेक गायक, वादक, नट यांची माहिती आहे. मराठी नाटकाची जननी खरे तर गोवाच. विष्णुदास भावे यांना मराठी नाटक लिहिण्याची प्रेरणा इथूनच मिळाली. इथल्या अभ्यासकांनी ते सप्रमाण सिद्धही केले आहे.
महादजी शिंदेंचे सेनापती जिवबादादा बक्षी, उत्कृष्ट तबलावादक खापरुजीमामा पर्वतकर या मराठी माणसांप्रमाणेच गोवा घडवण्यात ज्यांनी मोलाचा वाटा उचलला असे अनेक पोर्तुगीज ख्रिश्चन लोक आपल्याला समजतात. मिनेझिस ब्रिगांझा यांचा भव्य वाडा, म्हामई कामतांचा पणजीतील वाडा आणि त्यांच्या घरातील इंद्राचे ताट, याच्या सुरस कथा वाचताना आपण तल्लीन होतो.
मांडवी व जुवारी या गोव्यातील दोन प्रमुख नद्या. सागरालाही पोटात घेणाऱया, असे त्यांचे वर्णन आहे. या नद्यांमधून आजही वाहतूक चालते. पुरातन काळापासून या वाहतुकीने येथील संस्कृती संपन्न झाली आहे. या नद्यांच्या किनाऱयाने अनेक देवस्थाने, चर्चेस, तसेच प्रेक्षणीय वास्तू उभ्या आहेत.
शिवछत्रपती व संभाजी महाराज यांच्या उल्लेखाशिवाय तर गोव्याचा इतिहास अपूर्णच. एका बाजूला आदिलशाही, दुसऱया बाजूला पोर्तुगीज असे शत्रू असतानाही छत्रपतींनी गोव्यावर स्वारी केली होती. जुन्या दप्तरामधून संशोधन करून गोव्यातील अनेक लेखकांनी याबद्दल लिहिले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी तर गोवा जवळपास जिंकलाच होता, पण ऐनवेळी नदीला पूर आल्याने त्यांचा मनसुबा रहित झाला.
गोवा क्षेत्रफळाने तसे लहान राज्य. त्यामुळे दोनेक दिवसांच्या सहलीत ते पूर्ण पाहायचा लोक प्रयत्न करतात. मात्र पुरेशी माहिती नसल्याने आपण काय महत्त्वाचे ठिकाण पाहिले याची त्यांना कल्पना नसते. म्हणून, ‘असा हा गोमंतक’सारखे पुस्तक संग्रही असल्यास त्याचा जास्त फायदा पर्यटकांना होईल हे निश्चित.