
श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे होत असलेल्या शिवपुराण कथेसाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. पार्किंग आणि कथास्थळ यात चार किमीचे अंतर आहे. त्यात पाऊस पडला. सर्वत्र चिखल झाला. भाविक भक्तांचे मोठे हाल झाले. त्यांचे होणारे हाल कमी करण्याचा प्रयत्न बीडमधील पोलिसांनी केला. पार्किंग व्यवस्थेमध्ये असलेल्या पोलीस पथकांनी तब्बल 500 ते 700 अपंगांना आणि वृद्धांना पार्किंगपासून कथास्थळापर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे. चिखलामध्ये फसलेल्या गाड्या काढण्याचेही काम पोलिसांच्या या पथकाने केले. लष्कराप्रमाणे काम करणार्या बीडच्या पोलिसांना सलाम.
चाकरवाडी येथील कथेला रोज लाखो भाविक दाखल होत आहेत. दोन दिवस जोरदार पाऊस झाला. कथास्थळ परिसरामध्ये पावसामुळे सर्वत्र चिखल झाला. पार्किंग व्यवस्था ते कथास्थळ चार कि.मी.चे अंतर भाविकांसाठी कष्टप्राय ठरले. मात्र खरा आधार देण्याचे काम पार्किंग व्यवस्थेमध्ये असणार्या पोलीस पथकांनी केले. पीएसआय राजू गुळभिले, एएसआय उस्मान शेख, पो.कॉ.पवार, प्रकाश गायकवाड, बांगर, गोविंद सारूक, चंद्रप्रताप पवार, धनंजय ओव्हाळ, पीएसआय पवनसिंग जगदाळे हे गेल्या चार दिवसापासून कथास्थळी भाविकांच्या व्यवस्थेमध्ये आहेत.
या पथकाने तब्बल 500 ते 700 अपंगांना आणि वृद्धांना वाहन नसल्याने पाठीवर नेण्याचे काम केले आहे. चिखलात फसलेल्या अनेक गाड्या काढण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. सकाळी आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत पोलिसांच्या पथकाचे हे मदतकार्य अविरत चालू असते. विशेष म्हणजे या पथकात तीन मुस्लिम बांधव आहेत. या तीनही मुस्लिम बांधव असलेल्या पोलिसांनी वृद्धांना आपल्या खांद्यावर नेण्याचे काम केले आहे हे विशेष. शेख उस्मान आणि प्रकाश गायकवाड यांच्या कार्याचे नक्कीच कौतुक केले पाहिजे.