
मलकापुर तालुक्यातील धरणागावातील एका शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करुन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहली असून त्यामध्ये त्यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटल आहे. आरोपींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांसह नातेवाईक आक्रमक झाले आणि त्यांनी मृतदेह थेट पोलीस स्टेशनमध्ये नेला.
शिवाजी घुगरे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आत्महत्येचे कारण लिहले आहे. अवैध सावकारी करणारा अभिषेक कापसे याच्याकडून शिवाजी यांनी 6 हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्याची 40 हजार रुपये देऊन शिवाजी यांनी परतफेड केली होती. मात्र, अभिषेकने आणखी पैसे दे म्हणत सतत शिवाजी यांच्याकडे पैशांची मागणी केली. धक्कादायक बाब म्हणजे पैशांसाठी शिवाजी यांना दोन दिवसांपूर्वी मारहाण सुद्धा करण्यात आली होती. हा अपमान सहन न झाल्यामुळे शिवाजी घुगरे यांनी विष प्राशन केले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे घुगरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईकांनी शिवाजी यांचा मृतदेह थेट पोलीस स्टेशनमध्ये नेला आणि आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह नेणार नाही असे ठणकावून सांगितले. अखेर पोलिसांनी कारवाई करण्याचे अश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. शिवाजी घुगरे यांच्या पत्नी जयश्री घुगरे (34) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अभिषेक सुनील कापसे विरोधात अ.प नं 349 कलम 108, 62, 115 (2) 351 (2) BNS सह कलम महाराष्ट्र सावकारी अधिनियम 39, 45 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करुणाशील तायडे यांच्याकडे देण्यात आला आहे.