जयपूर-वांद्रे एक्सप्रेसमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटले 

वांद्रे-जयपूर एक्सप्रेसमध्ये व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवून 7 लाखांचा ऐवज चोरून चोरटय़ाने पळ काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. या गुह्याचा समांतर तपास रेल्वे गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.

जोगेश्वरी येथे राहणारे एक व्यावसायिक आपल्या कुटुंबीयांना घेऊन ते जयपूर येथून मुंबईला येत होते. दोन दिवसांपूर्वी त्याने जयपूरहून वांद्रे येथे जाणारी एक्सप्रेस पकडली. वांद्रे-जयपूर एक्सप्रेसच्या ए/1 कोचमधून ते प्रवास करत होते. अंधेरी स्थानक आल्यावर साहित्य दरवाजाजवळ काढून ठेवा, असे त्याना सांगितले. त्यानंतर ते बॅग घेऊन दरवाजाजवळ आले. त्यानंतर तीन जण तेथे आले. काही वेळानंतर त्या चौघांपैकी एकाने तक्रारदार यांना चाकू दाखवला. त्यानंतर तक्रारदार याने झडप मारून एकाला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एकाने त्यांना धक्का मारला. एक्सप्रेसचा वेग कमी झाल्यावर चोरटय़ाने उडी मारून पळ काढला. चोरटे हे जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान उतरून पळून गेले. चोरटय़ाने  दीड लाख रुपये, 1 लाख 3 हजार रुपयाचे सौदीचे चलन, सोन्याचा  हार घेऊन पळ काढला. घडल्या प्रकरणी त्याने बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. बोरिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.