
बाजारात नव्या नव्या प्रकारचा आकर्षक झाडू सहज उपलब्ध होतात. असे असताना जंगली गवताच्या झाडूला आजही ग्रामीण भागात मोठी मागणी आहे. ही तीच झाडू, ज्याने अनेकांनी अनेकांचा ‘ उतारा ‘ काढला आहे. ही झाडणी आता दुर्मिळ झाली आहे. शेताचा बांध्यावर कधी सहज उपलब्ध होणारी ही झाडणी तृणनाशक औषधींच्या माऱ्याने नष्ट झाली आहे. जंगलामध्ये ही झाडणी अल्प प्रमाणात मिळते.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघ मानव संघर्ष टोकावर गेलेला असताना जीवाची पर्वा न करता ग्रामीण भागातील काही मजूर ही झाडणी तोडतात. तोडलेल्या झाडणीला दोन ते तीन दिवस कडक उन्हात वाळविले जाते. झाडूला असलेले ‘ कुसर ‘ झाडलेले जातात. त्यानंतर तयार होते झाडू. ग्रामीण भागात या झाडूला मोठी मागणी आहे. चाळीस ते पन्नास रुपये प्रति झाडू विकली जाते. यातून काही प्रमाणात त्यांना आर्थिक मिळकत होते. बाजारात वेगवेगळ्या झाडू आल्या असल्या तरी उतारा काढणारया या झाडणी स्थान होते तसेच आहे.