
>> बद्रीनाथ खंडागळे
जायकवाडी धरणाच्या पायाभरणीला १८ ऑक्टोबर रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा प्रकल्पांत पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाणी आले. रेकार्डब्रेक क्युसेसचा जलविसर्ग करावा लागला. नाथसागर आताही तुडुंब भरला आहे… परंतु, कधी नव्हे ते मागील भागातील हजारो हेक्टर असंपादित शेतजमीन पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले. धरणाची जलसाठवण क्षमता १५२२ फूटच असताना असंपादित शेतांमध्ये पाणी शिरण्याची व्याप्ती वाढतच आहे. यंदा तर कहरच झाला आहे. वरच्या धरणांतून सोडलेल्या पाण्यासोबत येणाऱ्या अनियंत्रित गाळामुळे हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे आता समोर आले आहे. बॅकवॉटरच्या क्षेत्रात अजूनही विध्वंसक जलफुगवटा कायम असल्याने नाथसागर जलाशयातील गाळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मराठवाड्याला जलसंजीवनी देणाऱ्या ‘नाथसागर’च्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त या प्रकल्पाच्या १०० वर्षांच्या संकल्पित आयुष्यावरही गाळामुळेच अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
पाणी वापरावर गाळाच्या डोंगराएवढे प्रश्नचिन्ह!
नाथसागरमधील गाळाचे संशोधन व सर्वेक्षण करणाऱ्या २ तज्ज्ञ संस्था आहेत. ऊर्जा संशोधन केंद्र (पुणे) व महाराष्ट्र अभियांत्रिकी संस्था अर्थात ‘मेरी’ (नाशिक). त्यांचेही संशोधन झाले आहे. परंतु उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत. तंत्रज्ञानाच्या प्रगत युगामध्ये गाळाचे नेमके मोजमाप करणे फारसे अवघड नाही. त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा. कारण धरणाच्या प्रचंड अशा पाणपसाऱ्यामध्ये कागदोपत्री पाणीसाठा किती? त्याखाली साठलेला गाळ किती ? याचे उत्तर मिळायला हवे. कारण गाळामुळे जलसंचय नाममात्र असण्याची साधार शक्यता आहे. गाळाच्या मोजमापाची मोहीमच राबवायला हवी. हजारो हेक्टर्स सिंचन करणाऱ्या धरणातील पाण्यावर २५८ गावातील जवळपास ५५ लाख लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहे. ७ औद्योगिक परिसर व १३ साखर कारखान्यांना अहोरात्र पाणी पुरवले जात आहे. पाणी किती अन् गाळ किती? याचा उलगडा होत नाही तोपर्यंत नाथसागरची उपयुक्तता गाळातच रुतलेली राहणार आहे. कारण सध्यातरी धरणाच्या पाणी वापरावर गाळाच्या डोंगराएवढेच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.
रिमोट सेन्सिंग द्वारा गाळमोजणीचे तंत्र
दुसरे तंत्र दूरसंवेदन तंत्र (रिमोट सेन्सिंग) या नावाने ओळखले जाते. १९७६ ते १९९२ या कालावधीत नाथसागरसाठी हे तंत्र वापरून गाळाचे मोजमाप घेण्यात आले होते. जलाशयाची विरोध पाणी पातळी पृष्ठता गृहीत धरून जलविस्ताराची छायाचित्रे उपग्रहाच्या सहाय्याने काढण्यात आली होती. प्रतिवर्षी हा प्रयोग करण्यात आला. वर्षागणिक वाढलेला जलविस्तार दिसून आला. म्हणजेच पाणी तेवढेच, मात्र फुगवटा वाढला. अर्थात गाळाचे प्रमाण जास्त झाले, असा निष्कर्ष काढण्यात आला. गाळ मोजणीच्या ४६ वर्षांपूर्वी झालेल्या या ‘हायटेक’ प्रयोगाचा अहवालही त्यावेळी जाहीर करण्यात आला होता.
गाळ किती अन् पाणी किती… भले भले जलतज्ज्ञ निरुत्तर!
नाथसागर जलाशयात गाळ किती अन् पाणी किती? याचे उत्तर भल्याभल्या जलतज्ज्ञांकडेही नाही. त्यामुळे आगामी काळात कृषिसिंचन, उद्योग व पिण्याच्या पाण्याची उपयुक्तताच या गाळात रुतण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. तत्कालीन पंतप्रधान कै. लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते १८ ऑक्टोबर १९६५ रोजी जायकवाडीचे भूमिपूजन करण्यात आले होते. पैठणचे भूमिपुत्र कै. शंकरराव चव्हाण यांनी आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या या भव्य प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. जन्मभूमी पैठणमध्ये प्रकल्प उभा करून कर्मभूमी नांदेडपर्यंत कृषी सिंचनाची व्यवस्था केली. १८ ऑक्टोबर रोजी या ऐतिहासिक घटनेला ६० वर्षे पूर्ण होणार आहेत.
जायकवाडीची उपयुक्तताच गाळात रुतण्याची भीती!
शंभर वर्षांचे संकल्पित आयुष्य असलेल्या ‘नाथसागरा’त गाळाचे डोंगरच्या डोंगर उभे राहात आहेत! एकीकडे जायकवाडीची उपयुक्तताच गाळात रुतण्याची भीती आहे, तर दुसरीकडे संकल्पित आयुष्य घटून प्रकल्प निकामी होण्याचा धोकाही वाढला आहे. नाथसागर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील गाळाचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने १९९५ साली प्रथमच उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करण्याचा प्रयोग राबवण्यात आला होता. जलाशयातील वाढत्या गाळामुळे उपयुक्त जलसंचय क्षमता १० टक्क्यांनी कमी झाल्याचा अहवाल त्यावेळी देण्यात आला होता. ३० वर्षांपूर्वीची ही स्थिती आहे. १९७२ पासून धरणात पाणी साठायला सुरुवात झाली. त्यामुळे नाथसागराचे वय ४३ वर्षे झाल्याचे गृहीत घरले तरी संकल्पित १०० वर्षांचे आयुष्य या प्रकल्पाला लाभणार नसल्याचे जलतज्ज्ञांचे मत आहे. कारण पाणीवहन प्रक्रियेमध्ये गाळाचे वाहून येणे हे नैसर्गिक असले तरी प्रकल्पाची उभारणी करताना गाळप्रतिबंधक यंत्रणा उभारली जाते. धरणाच्या मूळ आराखड्यातच त्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात. जायकवाडीसाठीही उपाय योजण्यात आले होते. मात्र नाथसागरचे उथळ पाणलोटक्षेत्र आणि काठालगत वाढत जाणारे शहरीकरण मुळावर आले. ते रोखण्यासाठी पाणपसाऱ्याभोवती आणि काठांवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे आवश्यक होते. तसे करण्यात आले नाही.
२१ हजार चौरस किलोमीटरचे महाकाय पाणलोट क्षेत्र!
नाथसागरचे पाणलोटक्षेत्र २१ हजार चौरस किलोमीटर एवढे महाप्रचंड विस्तारलेले आहे. वरच्या भागात दारणा, कडवा, मुळा, प्रवरा, नारंगी, गुल, अगस्ती, भाम, भांबली, मुकनी, कश्यपी, शिवना व लेंडी या गोदावरीच्या उपनद्या आहेत. भूस्तराचे स्वरूप मैलागणिक बदलत गेल्यामुळे या उपनद्यांना हजारो नाले येऊन मिळतात. ते सर्व पाणी नाथसागरात येते. या जलप्रवाहासोबत प्रचंड प्रमाणावर गाळाचे डोंगरसुद्धा येतच असतात. गोदावरी नदीच्या उगमापासून ते थेट नांदूर मधमेश्वर गोदावरी खोरे या दरम्यान तब्बल ४ हजार १७३ चौरस मैलांचे अंतर आहे. आणि हा सर्व नाथसागरच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे!
पाणी आले अन् गेले… गाळ धरणातच !
या पार्श्वभूमीवर गेल्या ४ दशकांच्या काळात लाखो टन गाळ वाहून आलेला असावा असा अंदाज आहे. नाशिक भागात झालेली अतिवृष्टी व अनेक महापूर नाथसागराने आपल्या महाकाय पोटात सामावून घेतले आहेत. धरणाच्या पाणीसाठवण क्षमतेपेक्षा कित्येत पट अधिक पाणी प्रकल्पाच्या २७दरवाजांद्वारे गोदावरीत पुढे नांदेडपर्यंत सोडावे लागले आहे. महापुराच्या रूपात जीवनरुपी पाणी ‘संकट’ बनून आले, पुढे गेले. परंतु त्याच्यासोबत आलेला गाळ मात्र आगामी संकटाच्या रूपात धरणातच रुतून बसलेला आहे. गाळाचे मोजमाप करणारी अद्ययावत यंत्रणाच नाही. त्यातच यावर्षी पाणलोट क्षेत्रातील जलफुगवट्याने धारण केलेल्या रौद्ररूपामुळे गाळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
‘साऊंड मेथड’ : गाळमोजणीची पारंपारिक पद्धत
जलसंपदातज्ज्ञ आपल्या पद्धतीने गाळाची मोजणी करतात. ‘साऊंड मेथड’ नावाचे एक तंत्र पारंपरिक समजले जाते. जलपृष्ठभागावर एक होडी स्थिर केली जाते. वजन लटकवलेली दोरी विशिष्ट यंत्राद्वारे जलाशयात सोडली जाते. दोरी पाण्याखालच्या भूभागापर्यंत टेकल्यानंतर उंची मोजून निष्कर्ष काढला जातो. त्यानंतर केलेल्या फेरमोजणीत आढळणारा फरक म्हणजेच गाळाचा नवा (ताजा) थर मानला जातो. अत्यंत क्लिष्ट व सदोष असलेली ही पद्धत नाथसागरचा आवाका लक्षात घेऊन कधीच वापरली गेली नाही, हे विशेष!