
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण करून देवेंद्र फडणवीस सरकार स्वतःची वाहवा करून घेत आहे, परंतु या महामार्गाच्या कामात 15 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बगलबच्च्यांनी त्यात मलिदा खाल्ला, असा आरोप काँग्रेसने केला आहे. 55 हजार कोटींचा समृद्धी महामार्ग 70 हजार कोटींचा कसा झाला, असा सवाल करताना या प्रकल्पाबद्दल श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
समृद्धी महामार्ग उद्घाटन सोहळ्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली. घोडबंदर-भाईंदर बोगदा व उन्नत मार्ग प्रकल्पाप्रमाणे समृद्धी महामार्ग प्रकल्पातही मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्या भ्रष्ट पैशांतूनच ‘50 खोके एकदम ओके’चा कार्यक्रम झाला, असे सपकाळ म्हणाले. समृद्धी महामार्ग हा भ्रष्टाचाराचा महामार्ग आहे. या महामार्गासाठी किती पैसे लागले, कोणत्या पुलाला किती खर्च आला, एका किलोमीटरला किती खर्च आला, शेतकऱयांना भूसंपादनाचे किती पैसे दिले, पंत्राटदारांना किती दिले, झाडे लावण्यास किती खर्च आला आणि टोलमधून किती वसुली सुरू आहे याचा संपूर्ण लेखाजोखा श्वेतपत्रिकेतून मांडावा अशी मागणी सपकाळ यांनी केली.
अनेक ठिकाणी तडे
समृद्धी महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेक भागांत तडे गेले आहेत. महामार्ग सुरू झाल्यापासून विविध अपघातांत अनेकांना जीव गमवावा लागला, तर शेकडो जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्ग हा फक्त सत्ताधारी पक्षातील मोजक्या लोकांची समृद्धी करणारा प्रकल्प ठरला आहे. यात झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल झाली पाहिजे असेही सपकाळ म्हणाले.