लोककल्याणाचा संदेश पोहोचविणारी ‘चाकांवरची विकासगाथा’

महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयाचे व लोकोपयोगी योजना व विकास कामांची माहिती रेल्वेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने विशेष मोहिम घेतली आहे. यासाठी राज्यातील पाच एक्सप्रेस रेल्वे गाड्यांची निवड करण्यात आली असून त्या मुंबईपासून ते राज्याच्या कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये  लोककल्याणाचा संदेश घेऊन जाणाऱ्या चाकांवरची विकासगाथा ठरल्या आहे.

मुंबईहून सुटणाऱ्या आणि राज्याच्या विविध भागाकडे जाणाऱ्या रेल्वेसाठी ठाणे एक मध्यवर्ती स्थानक असून शासनाचा सचित्र संदेश घेऊन जाणाऱ्या या रेल्वेगाड्या ठाणे स्थानकावरील प्रवाशांसाठी आकर्षणाचा विषय बनल्या आहेत.

राज्य शासनाच्या लोकहिताच्या योजना सर्वसामान्य नागरिक व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो. यंदा त्यासाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची निवड करण्यात आली आहे. दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस, मुंबई-लातूर एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस, कोल्हापूर-गोंदिया व गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस या रेल्वेगाड्या संदेशासाठी निवडण्यात आल्या आहेत.

‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’ अशी टॅग लाईन घेऊन कृषी, आरोग्य, कोविड काळातील उपाययोजना, पर्यटन, महिला व बालविकास, सामाजिक न्याय, उच्च शिक्षण, कौशल्य विकास आदि विभागांची कामे आणि मोफत सातबारा, ई-पीक पाहणी, लसीकरण, चिंतामुक्त शेतकरी आदी विविध लोकोपयोगी योजनांची विकास गाथा मांडणारा समर्पक संदेश या रेल्वे गाड्यांच्या डब्यांवर आकर्षक पद्धतीने मांडण्यात आला आहे. दोन वर्षात सरकारने केलेल्या विविध विकास कामांचा आलेख प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’हा संदेश घेऊन या रेल्वे धावत आहेत.

विविध शहरे आणि गावातून जाणाऱ्या या रेल्वेगाड्या लोकोपयोगी योजनांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवित आहेत. चित्रमय संवादातून राज्य शासनाचा महासंवाद यानिमित्ताने होत असून या रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून विकासगाथा सांगितली जात आहे.