
एका मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावातील लोकांनी मुलीच्या कुटुंबातील 40 सदस्यांचे जबरदस्तीने टक्कल केले आहे. इतकंच नाही तर या कुटुंबाला गावाने वाळवीत टाकलं आहे. शुद्धीकरणाच्या नावाने या सदस्यांचे जबरदस्तीने टक्कल करण्यात आले आहे. ओडिशामधील रायगड जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बैगनगुडा गावातील तरुणीने शेजारच्या गावातील अनुसूचित जातीतील तरुणाशी प्रेमविवाह केला. हा विवाह गावातील जातिव्यवस्थेच्या तथाकथित नियमांनुसार चुकीचा मानला गेला. त्यामुळे मुलीच्या कुटुंबावर आणि नातेवाइकांवर प्रचंड सामाजिक दबाव टाकण्यात आला.
गावकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर हे कुटुंबांना पुन्हा त्यांच्या जातीत परतायचे असेल, तर त्यांना पारंपरिक शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यामध्ये जनावरांचे बलिदान आणि 40 लोकांचे जबरदस्तीने मुंडण करावे लागणार होते. असे न केल्यास संपूर्ण गाव त्यांना वाळीत टाकेल अशी धमकी गावकऱ्यांनी दिली होती. त्यामुळे दबावाखाली येऊन मुलीच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांची ही बाब ऐकावी लागली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. तसेच पोलिसांनी या ठिकाणी जाऊन तपासही सुरू केला आहे.