मुंबईसह उपनगरात विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी, राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

फोटो- गणेश पुराणिक

विश्रांतीनंतर आता राज्यभरात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवासांपासून मुंबईसह उपनगरात पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा एकदा पावसाची सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर, दक्षिण मुंबई तसेच मध्य मुंबईतही जोरदार पाऊस सुरु आहे. येत्या तीन चार तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

फोटो- गणेश पुराणिक

हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा, कोकणसह, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान मुंबई, ठाण्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

मराठवाडा विदर्भात अमरावतीसह चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट नागपूर वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.

रत्नागिरी, सातारा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ ,वर्धा,चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर रायगड ,मुंबई, ठाणे,पुणे कोल्हापूर घाटमाथा, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड याठिकाणी यलो अलर्टचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.