मी सरकारला सांगूनच देश सोडला! विजय मल्ल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

मी चोर नाही, पळपुटा तर नाहीच नाही. मी तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजप नेते अरुण जेटली यांना सांगूनच देश सोडला होता, असा खळबळजनक गौप्यस्पह्ट फरार मद्य उद्योजक विजय मल्ल्या याने केला आहे.

नऊ वर्षांनंतर प्रथमच माध्यमांसमोर आलेल्या मल्या याने यूटयुबर राज शमानी याच्या पॉडकास्टला दिलेल्या चार तासांच्या मुलाखतीत आपले जीवन, व्यवसाय, किंगफिशर एअरलाइन्सचे अपयश, कर्मचा-यांचे थकीत पगार आणि कायदेशीर लढाई यावर सविस्तर चर्चा केली. मल्ल्याने हिंदुस्थानी बँकांकडून 6200 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, ते कर्ज न फेडताच ते इंग्लंडला पळून गेले. त्यांच्याविरोधात फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्यावर केंद्रातील भाजप सरकारने त्यांना फरारी घोषित केले होते. दरम्यान, मी कायदेशीर लढा देत आहे. माझ्यावरील सुनावणी निपक्षःपातीपणे होईल, असे मला वाटले तर तर मी देशातही परतण्याचा विचार करेन. जर माझ्या नशिबात तुरुंगात जाणे असेल, तर त्यासाठीही मी तयार आहे, असेही मल्ल्या म्हणाला.

मी चोर नाही, बँकांनी माझ्याकडून दुप्पट वसुली केली!

मल्ल्या म्हणाला, मला चोर म्हणणेही चुकीचे आहे. कारण ज्या बँकांकडून मी कर्ज घेतले होते त्या 6200 कोटींच्या बदल्यात बँकांनी माझ्याकडून दुप्पट म्हणजे 14 हजार कोटी वसूल केले आहेत. बँकांसोबत सेटलमेंट करण्याचा विचार करत असतानाच माझा पासपोर्ट रद्द झाला आणि परदेशात अडकून पडलो, असा दावाही मल्ल्याने केला आहे.