
दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भागवत अशा संत वाङ्मयाचे अभ्यासक व ज्येष्ठ साहित्यिक वामन देशपांडे यांचे आज अल्प आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. गेली साठ वर्षे लेखन आणि व्याख्याने या माध्यमातून साहित्याची सेवा करणारा तपस्वी साहित्यिक हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. वामन देशपांडे यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा शिवमंदिर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मराठी साहित्य विश्वात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱया वामन देशपांडे यांची 125हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. संत साहित्यासह कविता, कथा, कादंबरी, समीक्षा अशा विविध क्षेत्रांत त्यांनी लेखन केले. रिझर्व्ह बँकेतून निवृत्त झाल्यानंतर ते डोंबिवलीच्या प्रियदर्शनी सोसायटीमध्ये राहायला आले होते. तेथील विविध साहित्य संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. 31 ऑगस्ट 1944 रोजी त्यांचा मुंबईत जन्म झाला. वामन देशपांडे यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
निवृत्तीनंतर वामन देशपांडे हे पूर्णवेळ मराठी साहित्याची सेवा करीत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेचे ते काही काळ अध्यक्ष होते. लहान मुलांसाठी त्यांनी संतांचा परिचय करून देणाऱया अनेक लेखमाला लिहिल्या. त्याची नंतर पुस्तकेही प्रकाशित झाली. ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत आणि नामस्मरण या विषयांवर महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये त्यांची प्रवचने आयोजित करण्यात आली होती. संत ज्ञानेश्वर यांना देशपांडे यांनी आपले आराध्य दैवत मानले होते.
दैनिक ‘सामना’मध्ये विपुल लेखन
वामन देशपांडे यांनी दैनिक ‘सामना’मध्ये अनेक वर्षे संत वाङ्मयावर विपुल लेखन केले. रविवारच्या उत्सव पुरवणीत त्यांचे सदर असायचे. ‘सामना’सह विविध वृत्तपत्रे तसेच दिवाळी अंकांतून त्यांनी आपल्या लेखनाची छाप पाडली.
पंधरा गीते ध्वनिमुद्रित
संत साहित्याचा अभ्यास व त्यावर लेखन करीत असतानाच वामन देशपांडे यांनी अनेक गीते व कविताही लिहिल्या. त्यांची पंधरा गाणी ध्वनिमुद्रित करण्यात आली आहेत. ज्येष्ठ गायक रामदास कामत यांनी ही गाणी गायली. त्यांच्याकडे विविध विषयांवरील तीन हजार पुस्तकांचा साठा होता.