
आणीबाणीचा दिवस संविधानाची हत्या दिवस म्हणून तुम्ही कसा काय साजरा करू शकता? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी विचारला. तसेच गेल्या 11 वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, भाजपला कुठल्याही गोष्टीचा उत्सव आणि राजकारण करायला मजा येते. ते कशाचाही उत्सव साजरा करतात. ट्रम्प यांनी मोदींना युद्ध थांबवायला सांगितलं, भाजप त्याचाही उत्सव साजरा करतील. आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. माझा तुम्हाला प्रश्न आहे की आणीबाणीचा दिवस संविधानाची हत्या दिवस म्हणून तुम्ही कसा काय साजरा करू शकता? आमच्या संविधानात आणीबाणीची तरतूद आहे. जेव्हा देशाला बाहेरच्या शक्तिकडून धोका असेल, अराजकता निर्माण करू पाहत असेल तर राष्ट्रपतींच्या सहीने तुम्ही आणीबाणी लागू करू शकता. हे संविधानात लिहिले आहे. आणि इंदिरा गांधी यांनी संविधानाचा संपूर्णपणे सन्मान करत त्यावेळी आणीबाणी लावली. इंदिरा गांधी यांनीच लोकांच्या समोर येऊन सांगितले की मी या कारणांमुळे आणीबाणी लावत आहे. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी आणीबाणी मागे घेतलीसुद्धा. आणि त्यानंतर तातडीने त्या निवडणुकांना सामोरं गेल्या. संविधानात आणीबाणीची तरतूद आहे, म्हणून तुम्ही संविधान हत्या दिन साजरा नाही करू शकत. निवडणुकीत हेराफेरी करून इंदिरा गांधी जिंकल्या असत्या. पण आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांनी निवडणूक जाहीर केली. निवडणूक हरल्या हा पराभव त्यांनी स्विकारला. आज असं होतना दिसतं का? गेल्या 11 वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी आहे. त्यावेळी तुर्कमान गेटवर संजय गांधी यांनी बुलडोझर चालवले होते. आज तर दररोज गरीबांवर बुलडोझर चालवला जात आहे. जात आणि धर्म विचारून बुलडोझर चालवला जात आहे. त्यावेळच्या विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकलं गेलं होतं. पण तुरुंगात त्यांच्यासाठी सगळी व्यवस्था होती. इंदिरा गांधी या स्वतः अटल आडवाणी यांना फोन करत होत्या. इथे मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं आहे. कोर्टाने त्यांना निर्दोष सांगत सोडून दिलं. ही आणीबाणी नाहीये का? हे आणीबाणीचा बाप सुरू आहे. आणि आपण या आणीबाणीतून जातोय. इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या काळात सर्व भ्रष्टाचारी आणि काळा बाजार करणारे तुरुंगात होते. करीम लाला, हाजी मस्तान, वरदा राजन हे सर्व तुरुंगात होते. मिसा कायद्याखाली त्यांना अटक झाली होती. आता असे लोक भाजपमध्ये आहे. आज जर करीम लाला, हाजी मस्तान, वरदा राजन हयात असते तर ते भाजपचे मंत्री किंवा पक्षात मोठ्या पदावर असते. हा दोन आणीबाणींमधील फरक आहे. इंदिरा गांधी यांनी संविधान या हत्याराचे वापर करून आणीबाणी लावली होती. संविधानाच्या चौकटीत राहून इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली होती. पण मोदी सरकारने अघोषित आणीबाणीत सर्वांना चिरडलं आहे. म्हणून म्हणतोय की सध्या जे सुरू आहे ते आणीबाणीचा बाप आहे. नोटबंदी काय होती? किती लोकांचा मृत्यू झाला त्यात? 1975 साली जी आणीबाणी होती ती सोडून गेल्या 11 वर्षात जी आणीबाणी सुरू आहे त्यासाठी संविधान हत्या दिवस साजरा करा असे संजय राऊत म्हणाले.
अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर स्वतः संविधान तज्ज्ञ आहे. आणि प्रकाश आंबेडकर हे जनतेचे प्रतिनिधी म्हणून कोर्टात लढत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण मतदार संघात मतांची चोरी कशी झाली याचे राहुल गांधी यांनी पुरावे दिले आहेत. तुम्ही मान्य तरी करा आम्ही चोरी केली आहे. तुम्ही सगळ्यात मोठे चोर आहात. तुमची चोरी पकडल्या गेल्यानंतरही तुम्ही चोरी केल्याचे मान्य करत नाही. महाराष्ट्रात विधानसभेत काय गोंधळ झाला याची राहुल गांधी यांनी पोलखोल केली.
हे पहिल्यांदा घडलं की कुठल्यातरी देशाने अमेरिकेवर हल्ला करण्याची हिंमत दाखवली. ते आपल्या सुरक्षेसाठी. यासाठी हिंदुस्थानचे जे विश्वगुरू आहेत त्यांनी विचार केला पाहिजे की खोमेनी यांनी एवढी मोठी छाती कुठून आणली याचे संशोधन झाले पाहिजे. ना ट्रम्पसमोर झुकले ना नेतन्याहूपुढे झुकले, ना कुठल्या दबावाखाली झुकले. आपल्या देशावर जो हल्ला झाला त्याच्या विरोधात लढले आणि सर्वांना गुडघ्यावर आणलं. ट्रम्प यांनी हल्ला केला आणि त्यालाही प्रत्त्युत्तर दिले. याबाबत संघाने संशोधन केले पाहिजे आणि त्याचा अहवाल मोदींना दिला पाहिजे असेही संजय राऊत म्हणाले.
या महाराष्ट्रात जो घोटाळा होता आहे त्याची तुलना कुठल्याही घोटाळ्याशी होणार नाही. 19 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन झाले. देवेंद्र फडणवीसांचा हा ड्रीम प्रोजेक्ट, या प्रोजेक्टमध्ये 50 टक्के घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यातील पैसा निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी, आमदार, खासदार विकत घेण्यासाठी, शिवसेना आणि राष्ट्रवादीची लोकं विकत घेण्यासाठी या ड्रीम प्रोजेक्टचा पैसा बाहेर आला. आज तुम्ही इगतपूरी आमनेर रस्त्याची अवस्था पाहा. आता हे लोक शक्तीपीठाच्या मार्गाला लागले आहेत. यासाठी 20 हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी किमान 10 हजार कोटी बाहेर येतील. जसे MMRDA चे तीन हजार कोटी रुपये बाहेर आले. आणि हे 10 हजार कोटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरले जातील. हे सगळे ड्रीम प्रोजेक्ट सुरू आहेत ठेकेदारांकडून हजारो कोटी रुपये काढण्यासाठी सुरू आहेत. सगळ्यात आधी आपले खिसे भरा, आपल्या बॅगा भरा आणि त्या पैश्यांतून ही सगळी खरेदी विक्री करा असं सगळं सुरू आहे. समृद्धी महामार्गात फक्त ठेकेदारांना दोषी ठरवता येणार नाही. त्या संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना ताबडतोबत मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे. ही सगळी कमिशनबाजी आहे. माळेगाव कारखान्याला 500 कोटी देणार आहेत. एवढे पैसे तुम्ही कुठून आणणार आहात? एका कारखान्याला तुम्ही 500 कोटी रुपये देणार. एका कारखान्याचा निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री 20 दिवस खुर्ची टाकून बसतात. काय चाललंय या राज्यामध्ये. महाराष्ट्राची फक्त लूट सुरू आहे असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.