IND Vs ENG 1st Test – दोन्ही संघांचे खेळाडू काळीपट्टी बांधून मैदानात उतरले, कारण काय?

इंग्लंडमधील हेंडिग्ले येथील लीड्सच्या मैदानावर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून (20 जून 2025) सुरुवात झाली. इंग्लंडने नाणेफेक जिंकत टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी दोन्ही संघ जेव्हा मैदानात उतरले, तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या दंडावर काळीपट्टी बांधण्यात आली होती.

हिंदुस्थानातून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा 12 जून रोजी अहमदाबादमध्ये उड्डान घेतल्यानंतर अवघ्या 30 सेकंदात भयंकर अपघात झाला होता. या अपघातात 290 हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. पहिल्या कसोटी सामन्यात या दुर्दैवी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू दंडावर काळीपट्टी बांधून मैदानात उतरले. नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानात आले, तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंनी अहमदाबाद अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली तसेच एक मिनिटांच मौन सुद्धा पाळलं.