नवी मुंबई विमानतळावरून इंडिगोच्या 30 हून अधिक नव्या उड्डाणांना सुरुवात, देशभरातील शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडिगो या विमान कंपनीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 30 हून अधिक नवीन उड्डाण मार्ग सुरू करण्याची घोषणा केली आहे. या उड्डाणांना 29 मार्चपासून सुरुवात झाली असून 23 एप्रिलपर्यंत टप्प्याटप्प्याने नवीन मार्ग सुरू केले जाणार आहेत.

या नव्या उड्डाणांमुळे नवी मुंबई विमानतळाचा संपर्क आग्रा, अयोध्या, बागडोग्रा, बेळगाव, चंदीगड, दीव, कन्नूर, कोलकाता, पटना, राजकोट, श्रीनगर, वाराणसी, विशाखापट्टणम यांसारख्या महत्त्वाच्या शहरांशी जोडला जाणार आहे. त्यामुळे देशातील विविध भागांमध्ये प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या नव्या उड्डाणांनंतर नवी मुंबई विमानतळावरून दर आठवड्याला 400 हून अधिक उड्डाणे ऑपरेट केली जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार असून देशांतर्गत कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळणार आहे.

दरम्यान, कंपनीने रविवारीपासून भावनगर आणि नवी मुंबईदरम्यान दिवसातून दोन वेळा थेट उड्डाण सेवा सुरू केल्याचीही घोषणा केली आहे. या मार्गावर ATR विमानांचा वापर करण्यात येत असून प्रवाशांना विश्वासार्ह आणि सोयीस्कर सेवा देण्याचा कंपनीचा उद्देश आहे.

याशिवाय, या महिन्याच्या सुरुवातीला जामनगरसाठीही थेट उड्डाण सेवा सुरू करण्यात आली असून 23 एप्रिलपासून ती नियमित होणार आहे. या नव्या उड्डाणांमुळे इंडिगो आता गुजरातमधील अहमदाबाद, वडोदरा, सूरत, राजकोट, भावनगर आणि जामनगर या सहा शहरांमध्ये सेवा देणार आहे. या राज्यात कंपनीकडून दर आठवड्याला 1,400 हून अधिक उड्डाणे चालवली जाणार आहेत.