आज होणार स्वप्न साकार! पंजाब अन् बंगळुरूपैकी एक उंचावणार आयपीएल ट्रॉफी, दोघे पहिल्यावहिल्या आयपीएल जेतेपदासाठी सज्ज

आयपीएलचा 18वा हंगाम आता आपल्या सर्वोच्च उंचीवर पोहोचलाय. पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सचे स्वप्न उदध्वस्त करत पंजाब किंग्जने क्वालिफायर-2 जिंकून 11 वर्षांनंतर फायनल गाठली. आता जेतपदासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात उद्या (दि. 3) जगातील सर्वात मोठय़ा अहमदाबादच्या क्रिकेट स्टेडियमवर विजेतेपदाचा फैसला होणार आहे. उभय संघांनी अद्यापि या स्पर्धेत एकदाही विजेतेपद जिंकलेले नसल्याने यंदाच्या आयपीएलमधून नवा विजेता लाभेल. सोबत आयपीएलच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी 18 वर्षांपासून धडपडत असलेले हे दोन्ही संघ उद्या मैदानावर जिवाचे रान करताना दिसतील. त्यामुळे मंगळवारचा दिवस क्रिकेटशौकिनांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.

बंगळुरूपंजाबचा आयपीएल प्रवास

वर्ष      बंगळुरू    पंजाब

2008 साखळी   साखळी

2009 उपविजेता            साखळी

2010 तिसरा     साखळी

2011 उपविजेता            साखळी

2012 साखळी   साखळी

2013 साखळी   साखळी

2014 साखळी   उपविजेता

2015 एलिमिनेटर          साखळी

2016 उपविजेता            साखळी

2017 साखळी   साखळी

2018 साखळी   साखळी

2019 साखळी   साखळी

2020 एलिमिनेटर          साखळी

2021 एलिमिनेटर          साखळी

2022 क्वालिफायर 2      साखळी

2023 साखळी   साखळी

2024 एलिमिनेटर          साखळी

2025 कुणाचे होणार स्वप्न साकार

अय्यरपाटीदार सात महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये आमनेसामने

पंजाब संघाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर असून, बंगळुरूचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. विशेष म्हणजे, दोन्ही कर्णधार सात महिन्यांच्या आत पुन्हा एकदा फायनलमध्ये आमने-सामने  ठाकले आहेत. यापूर्वी दोन्ही कर्णधारांमध्ये गतवर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत सामना झाला होता. त्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने पाटीदारच्या संघाला पराभूत केले होते. आता हेच उभय कर्णधार पुन्हा भिडणार असले तरी यावेळी पाटीदारला घाबरण्याचे कारण नाही; कारण त्याच्या पाठीशी दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली आहे. रजत पाटीदार आणि श्रेयस अय्यर हे दोघेही युवा कर्णधार आहेत. दोघेही हुशार, आणि दोघांच्याही खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे मैदानावर नुसते चौकार-षटकार नाही, तर रणनीतींची जुगलबंदीही पाहायला मिळणार हे नक्की!

तर अय्यर पहिलाच कर्णधार

आयपीएलमध्ये महेंद्र सिंग धोनी आणि रोहित शर्मा यांनी सलग जेतेपदे जिंकली आहेत. धोनीने 2010 आणि 2011 साली चेन्नईला सलग विजेतेपद मिळवून दिलेय, तर रोहित शर्माने 2019 आणि 2020 या मोसमात मुंबईला चौथे आणि पाचवे जेतेपद जिंकून दिले. आता श्रेयस अय्यरही सलग दुसऱ्या जेतेपदाच्या उंबरठय़ावर आहे. जर त्याने बंगळुरूचा पराभव केला तर तो दोन वेगवेगळय़ा संघांसाठी आयपीएल जिंकणारा तो पहिलाच कर्णधार ठरेल. गेल्या वर्षी त्याने कोलकात्याला आपल्या नेतृत्वाखाली जेतेपद जिंकून दिले होते.

संभाव्य अंतिम संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ः रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, फिल सॉल्ट (यष्टिरक्षक), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), मयांक अगरवाल, लियाम लिव्हिंगस्टन, कृणाल पंडय़ा, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जॉश हेझलवूड, यश दयाल, सुयश शर्मा.

पंजाब किंग्ज ः प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग,  श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहाल वढेरा, जोस इंग्लिस (यष्टिरक्षक), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्लाह ओमरजई, विजयकुमार वैशाक, कायल जेमिसन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल/हरप्रीत ब्रार.

तर श्रेयस अय्यरच उंचावणार करंडक

अहमदाबादला दोन्ही दिवस पाऊस पडला आणि एकाही चेंडूचा खेळ न होऊ शकल्यास साखळीत अव्वल असलेल्या पंजाबला विजेते घोषित केले जाईल आणि कर्णधार श्रेयस अय्यर सलग दुसऱ्यांदा आयपीएलचा चषक उंचावेल. जर पावसाच्या व्यत्ययामुळे 20 किंवा 10 षटकांचाही सामना होऊ शकला नाही तर पाच-पाच षटकांचाही सामना खेळविण्याची शक्यता आहे. मात्र तो खेळही होऊ न शकल्यास सुपर ओव्हरची मदत घेत जेतेपदाचा फैसला लावला जाईल. त्यामुळे अंतिम सामन्याला पावसाचा व्यत्यय किती मोठा आहे यावर त्याचे भवितव्य अवलंबून असेल.

पंजाबचे खेळाडू फॉर्मात

पंजाब संघाने आयपीएल इतिहासात 6 वेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या मुंबई इंडियन्सला पराभूत करून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यर जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने या स्पर्धेत या वर्षी 603 धावा फटकावल्या आहेत. त्याने आपल्या फलंदाजीने संघातील इतर खेळाडूंना प्रेरणा दिली आहे आणि यामुळेच तो आयपीएलच्या इतिहासात कोलकाता, दिल्ली आणि आता पंजाब या तीन वेगवेगळय़ा संघांना अंतिम फेरीत पोहचविणारा कर्णधार ठरलाय. पंजाबकडून अर्शदीप सिंग, अजमतुल्लाह ओमरझई हे मुंबईविरुद्ध सामन्यात प्रभावी ठरले होते. विशेषतः कायल जेमिसन आणि विजयकुमार वैशाक यांनी मोक्याच्या क्षणी मोलाची कामगिरी केली. त्यामुळे बंगळुरूच्या फलंदाजीचाही कस लागणार आहे.

पाऊस येणार मोठ्ठा?

कोलकात्यात पावसाची शक्यता असल्यामुळे  अंतिम सामना अहमदाबादला स्थलांतरित करण्यात आला होता; मात्र आता अहमदाबादलाही पावसाची शक्यता असल्यामुळे अंतिम सामन्यावर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. हा सामना पूर्णपणे खेळविण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. त्यामुळे सामन्याच्या वेळेव्यतिरिक्त 120 मिनिटांची वेळही वाढवून देण्यात आली आहे. तसेच 4 जून हा राखीव दिवसही ठेवण्यात आला असल्यामुळे अंतिम सामना पूर्ण होईल असा विश्वास आहे.