IPL 2025 सूर्यवंशीच्या शतकापासून पंतच्या संघर्षापर्यंत, आयपीएलच्या 18 व्या मोसमात फटकेबाजीची धमाल

आयपीएलच्या 18 व्या मोसमाला खऱया अर्थाने गाजवले ते 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने. सूर्यवंशीच्या रूपाने हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये एका नव्या झंझावाताचा उदय तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटपटू ठरलेल्या ऋषभ पंतचा एकेका धावेचा संघर्ष आणि त्यानंतर वादळी शतकाने केलेला आयपीएल समारोप क्रिकेटप्रेमींना चांगलाच भावला.

आयपीएलच्या 70 साखळी सामन्यांचा थरार ऋषभ पंतच्या शतकासह जितेश शर्माच्या 33 चेंडूंतील 85 धावांच्या खेळीने संस्मरणीय केला. सूर्यवंशीच्या साथीने प्रियांश आर्यचे शतकही काwतुकास्पद ठरले. वैभवप्रमाणे प्रियांशसुद्धा एकही प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाहीय. मुंबईकडून विघ्नेश पुथूर आणि अश्वनीकुमार या नवोदितांनीही आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले. गतविजेत्या कोलकात्याला साखळीतच पराभवाचा धक्का सहन करावा लागला, तर आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नईला आपल्या कारकीर्दीत दारुण कामगिरीला सामोरे जावे लागले. चेन्नई आणि राजस्थान हे दोन्ही संघ दहा पराभवांसह तळाला राहिले. तसेच गेल्या दहा वर्षांत एकदाही प्ले ऑफ न गाठलेल्या पंजाबला श्रेयस अय्यरने जेतेपदाच्या शर्यतीत आणताना अव्वल स्थान पटकावून दिले आहे.

आयपीएलच्या साखळीतील संस्मरणीय घडामोडी

– आयपीएलच्या इतिहासात प्रथमच दहा फलंदाजांनी 500 पेक्षा अधिक धावा ठोकल्या. यातील पाच फलंदाजांनी 600 पेक्षा अधिकही धावा केल्या आहेत.
– विराट कोहलीने आयपीएलच्या इतिहासात सर्वप्रथम नऊ हजार (यात चॅम्पियन्स लीगमधील 424 धावाही आहेत) धावांचा टप्पा गाठला. तसेच एका मोसमात सर्वाधिक आठ अर्धशतके ठोकण्याच्या फॅफ डय़ु प्लेसिसच्या विक्रमाची बरोबरी साधली. त्याचबरोबर सर्वाधिक 62 अर्धशतकांचा डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडत सर्वाधिक शतके आणि अर्धशतके हे दोन्ही विक्रम स्वतःच्या नावावर केले.
– आयपीएलमध्ये यंदा 9 फलंदाजांनी शतके ठोकली. त्यात 7 शतके हिंदुस्थानी फलंदाजांनी ठोकली. तसेच 10 फलंदाजांनी नव्वदी गाठलीय. आयपीएलच्या इतिहासात 2018 साली 11 फलंदाजांनी नव्वदी गाठली होती.
– चेन्नई आणि राजस्थानला सलग पाच पराभवांचा सामना करावा लागला तर मुंबईने सलग सहा विजयांनी नोंद केली. मुंबईवगळता अन्य एकाही संघाला सलग पाचही विजय नोंदविता आले नाही.
– गेल्या वर्षी प्ले ऑफ गाठणाऱया कोलकाता, हैदराबाद आणि राजस्थान या तिन्ही संघाचे साखळीतच आव्हान संपुष्टात आले. फक्त बंगळुरू हा एकमेव संघच प्ले ऑफला पोहोचला.
– हैदराबादने या मोसमाच्या आपल्या पहिल्या सामन्यात राजस्थानविरुद्ध 6 बाद 286 तर आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात कोलकात्याविरुद्ध 3 बाद 278 धावा करून आयपीएल इतिहासातील दुसऱया आणि तिसऱया सर्वोच्च क्रमांकाची सांघिक धावसंख्या उभारली.
– वैभव सूर्यवंशीने आयपीएल इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक ठोकताना 35 चेंडूंत 11 षटकार आणि 7 चौकार लगावले. या खेळीमुळे तो टी-20 क्रिकेटमधील सर्वात तरुण शतकवीरही ठरला.