
शेतात शेती काम करत असतांना विजेचा धक्का लागून वडिलांसह दोन लेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जालना तालुक्यातील वरुड घडली. विनोद तुकाराम मस्के (32)यांच्यासह श्रद्धा म्हस्के (10) आणि समर्थ मस्के (7) या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे वरुडसह परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.
वरुड शिवारातील शेतातमध्ये विनोद तुकाराम म्हस्के शेतात शेतीकाम करत होते. शेतामध्ये मल्चिंग पेपर अंथरत असतानाच शेतातून विद्युत प्रवाह घेऊन जाणारी केबल तुटून म्हस्के यांना विजेचा धक्का बसला. या विजेच्या धक्क्याने विनोद म्हस्के जमिनीवर कोसळले. वडील जमिनीवर का पडले हे पाहण्यासाठी बाजूला खेळणारी श्रद्धा आणि समर्थ हे दोन चिमुकले वडिलांना उठवण्यासाठी गेले. परंतु, विनोद मस्के यांच्या अंगात विद्युत प्रवाह असल्याने या दोन चिमुकल्यांनाही विजेचा धक्का बसला. या दुर्दैवी घटनेत या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना विनोद मस्के यांच्या पत्नी यांनी पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरोड केली. म्हस्के यांच्या शेतामध्ये सुरू असलेला आरडाओरडा ऐकून आजू-बाजूच्या शेतकर्यांनी धाव घेतली व विद्युत प्रवाह खंडित केला.
त्यानंतर विनोद मस्के, श्रद्धा आणि सार्थक या तिघांना जालन्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर या तिघांना मृत घोषित केले. या तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णाण्यात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ही घटना वटपौर्णिमेच्या दिवशीच घडल्याने गावासह परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.