
जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या वावर आणि वांगणी या गावांना जोडणारा लेंडी नदीवरील पूल धोकादायक बनला आहे. त्यामुळे या पुलाचा वापर बंद करण्यात यावा अशी अधिसूचना पालघरच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांनी काढली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आसले ल्या कुंडमाळ येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची दुर्घटना 15 जून रोजी घडली होती. त्यात पाचजणांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासनाने धोकादायक पुलाचा वापर बंद करण्यासाठी अधिसूचनांचा धडाका सुरू केला आहे.
वावर-वांगणी येथे लेंडी नदीवरील पूल 1992 साली बांधण्यात आला आहे. 2023 मध्ये स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल कमकुवत व धोकादायक झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे 20224 साली तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी अधिसूचना जारी करून अवजड वाहतूक बंदीचे आदेश जारी केले होते. 1992 साली कुपोषणामुळे झालेल्या शेकडो बालमृत्यूमुळे वावर आणि वांगणी ही गावे चर्चेत आले होते. या गावात जाण्यासाठी अडचणी येत असल्याने हा पूल तयार करण्यात आला होता. 33 वर्षांपूर्वी बांधलेला हा धोकादायक झाला असतानादेखील शासन स्तरावर हा पूल बांधण्यासाठी निधी दिला जात नाही. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होऊन दोन वर्षे झाली असतानादेखील पूल मंजूर केला जात नाही. यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.