
मी धर्मवीर आनंद दिघे यांचा शिष्य आहे. त्यांच्या शिकवणीवर चालतो, दिघे साहेबांच्या पवित्र स्मृतीला मानतो अशी डायलॉगबाजी करणाऱ्या आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर सिनेमा काढत स्वतःचे मार्केटिंग करणाऱ्या मिंधेंनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने राखीव असलेले कल्याण ग्रामीण भागातील नागाव गोठेघर येथील क्रीडांगणच मोदींच्या नावाने सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या घशात घातले आहे. या क्रीडांगणावर आता म्हाडा पंतप्रधान आवास योजनेची घरे बांधणार असून त्यासाठी 1.3 हेक्टर क्षेत्रावर जेसीबी व बुलडोझर धडका देऊ लागले आहेत.
मोदींच्या योजनेसाठी धर्मवीरांच्या नावाने असलेल्या क्रीडांगणाचा बळी देणाऱ्या मिंधेंविरोधात कल्याण ग्रामीण क्षेत्रातील उत्तरशीव, भंडार्ली, माणिकपाडा, नागाव, डायघर आणि गोठेघर परिसरातील ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे.
कल्याण ग्रामीण क्षेत्रात नागाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत मौजे गोठेघर येथे (सर्व्हे क्रमांक 157) 1.3 हेक्टर क्षेत्रावर धर्मवीर आनंद दिघे क्रीडांगण आहे. 2014 मध्ये ग्रामपंचायतीने ठराव करून हा भूखंड धर्मवीर आनंद दिघे क्रीडांगण म्हणून आरक्षित केला आहे. या क्रीडांगणावर आसपासच्या दहा गावांतील खेळाडू क्रिकेट व अन्य क्रीडा प्रकारांचा सराव करतात. याच मैदानावर धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने भव्य क्रिकेट चषक स्पर्धा होतात. शाळांच्या क्रीडा स्पर्धाही भरतात. स्वतः आनंद दिघे जीवित असताना अनेकदा या मैदानावर खेळाडूंची पाठ थोपटण्यासाठी येत असत. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर या क्रीडांगणाला दिघे यांचे नाव देत ते राखीव करण्यात आले.
एकनाथ शिंदेंनी बोळवण केली
शिंदे यांनी ‘काळजी करू नका, मी दिघे साहेबांचा शिष्य आहे, त्यांच्या नावाचे क्रीडांगण कोणाच्याही घशात घालू देणार नाही’ असे सांगत गावकऱ्यांची बोळवण केली. मात्र या आश्वासनाला दोन महिने उलटत नाही तोच सोमवारी 26 मे रोजी पोलिसांचा फौजफाटा आनंद दिघे क्रीडांगणावर धडकला. शिर्पे नामक बिल्डरने या क्रीडांगणाच्या चारही बाजूने पत्रे ठोकून मैदानात जेसीबी आणि पोकलेन घुसवले. गेल्या दोन दिवसांपासून या मैदानावर म्हाडाचे प्लॉटिंग सुरू झाले आहे.
…तर रस्त्यावर उतरू! शिवसेनेचा इशारा
धर्मवीर आनंद दिघे क्रीडांगणावर बिल्डरांचे जेसीबी आणि पोकलेन घुसल्याचे कळताच शिवसेना पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभाप्रमुख रोहिदास मुंडे यांनी शिवसैनिकांसह धडक दिली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने असलेले गोठेघर येथील क्रीडांगण म्हणजे केवळ गावकरी, खेळाडूंचाच नव्हे तर धर्मवीरांच्या विचारांवर चालण्यासाठी अभिमानाचा आणि श्रद्धेचा विषय आहे. धर्मवीरांचे नाव नष्ट करण्याचा नतद्रष्टपणा कदापि सहन करणार नाही. सरकार आणि प्रशासनाने याचे उत्तर दिले नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी रोहिदास मुंडे, उपजिल्हाप्रमुख रमेश पाटील, उपतालुकाप्रमुख जितू पाटील, दिवा शहर संघटक ज्योती पाटील, विभागप्रमुख रवी रसाळ व उत्तरशीवच्या ग्रामस्थांनी दिला.