
मणिपूरच्या उखरुलमध्ये हिंसाचाराचे वृत्त समोर आले आहे. लिटन सारेखोंग गावात काही सशस्त्र गटाने अनेक घरांना आग लावल्याचे वृत्त आहे. परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती असल्याने प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात कर्फ्यू लागू केला आहे. तसेच कोणत्याही अफवा पसरवण्यात येऊ नये, यासाठी पाच दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत.
लिटन सारेखोंग गावात सशस्त्र दरोडेखोरांनी अनेक घरांना आग लावल्यानंतर मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात नवीन हिंसाचार उसळला. सशस्त्र गटांनी डोंगराळ गावाजवळ हवेत अनेक गोळीबार केल्याचे वृत्त आहे. पुन्हा हिंसाचार उफाळून आल्याने तांगखुल ग्रामस्थांनी हा परिसर सोडल्याचे वृत्त आहे. प्रशासनाने परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले.
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास, लिटन सारेखोंग येथे कुकी अतिरेक्यांनी तांगखुल नागा समुदायाच्या सदस्यांची अनेक घरे जाळल्याचा आरोप आहे. जवळच्या परिसरात कुकी समुदायाची काही घरेही जाळण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती तणावपूर्ण आहे. आतापर्यंत एकूण २१ घरे जळून खाक झाली आहेत. परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री वाय खेमचंद सिंह यांनी रिम्स रुग्णालयात जखमींची भेट घेतली आणि त्यांना वैद्यकीय मदतीचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की गैरसमजातून उद्भवलेली ही घटना आता नियंत्रणात आहे आणि सर्व समुदायांना संयम बाळगण्याचे, कायद्याचे राज्य राखण्याचे आणि शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

























































