ऑलिम्पिक दिनाला ऑलिम्पियन खेळाडूंचाच विसर, फ्लेक्सवर नेत्यांची चमकोगिरी; ऑलिम्पियन्सची वानवा

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा स्थापना दिवस 23 जून 1894 आहे, म्हणून हा दिवस जागतिक ‘ऑलिम्पिक दिन’ म्हणून साजरा केला जातो. पुण्यातही हा दिन सोमवारी साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात 85हून अधिक ऑलिम्पियन खेळाडू होऊन गेले. यांतील काही खेळाडू आता हयात नाहीत; परंतु बरेच ऑलिम्पियन खेळाडू आजही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत. खाशाबा जाधव, स्वप्नील कुसाळे, धनराज पिल्ले या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. मात्र पुण्यात साजऱ्या झालेल्या आजच्या आलिम्पिक दिनाच्या कार्यक्रमात स्टेजवरील फ्लेक्सवर फक्त नेत्यांच्याच फोटोंची चमकोगिरी बघायला मिळाली. ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवून महाराष्ट्राची पताका फडकावली, त्या ऑलिम्पियन खेळाडूंच्या फोटोंचा मात्र आयोजकांना विसर पडला. सोशल मीडियावर सध्या फ्लेक्सवरील चमकोगिरीवरून नेटकऱ्यांनी ‘एमओए’ आणि राज्य शासनावर टीकेची झोड उडवली आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने आयोजित केलेल्या ऑलिम्पिक दिनाच्या कार्यक्रमात केवळ रेखा भिडे, मनोज पिंगळे या दोनच ऑलिम्पियन खेळाडूंचा गौरव करण्यात आला. धनराज पिल्ले, अंजली भागवत, बाळकृष्ण अकोटकर, आदील सुमारीवाला, ललिता बाबर, कविता राऊत, दत्तू भोकनाळ, देवेंद्र वाल्मीकी, विक्रम पिल्ले, प्रार्थना ठोंबरे, अपर्णा पोपट, निखिल कानिटकर, वीरधवल खाडे, सुमा शिरूर, दीपाली देशपांडे, राही सरनोबत असे अनेक ऑलिम्पियन खेळाडू महाराष्ट्रात आहेत. रक्ताचे पाणी करून हे खेळाडू आलिम्पिकचे तिकीट मिळवीत असतात. खरेतर सर्व ऑलिम्पियन खेळाडूंना कार्यक्रमाला बोलाविणे शक्य नसेल किंवा सर्वांना ऑलिम्पिक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येईलच असेही नाही. मात्र या सर्वांचे फोटो किमान फ्लेक्सवर लावून ऑलिम्पिक दिनानिमित्त आपण या मर्दुमकी गाजविणाऱ्या ऑलिम्पिकवीरांना मानवंदना तरी देऊ शकतो. मात्र आजच्या कार्यक्रमात ऑलिम्पिकवीर खेळाडूंची वानवा बघायला मिळाली. या कार्यक्रमात ‘एमओए’चे अध्यक्ष अजित पवार, राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचेच फोटो फ्लेक्सवर बघायला मिळाले. शिवाय पूर्ण वेळ क्रीडा पत्रकारिता करणारे अनेक क्रीडा पत्रकार ऑलिम्पिकची वारी करीत असतानाही  ऑलिम्पिक वार्तांकन करणाऱ्या केवळ एकाच मुक्त पत्रकाराचा गौरव करणे म्हणजे इतर ऑलिम्पिक वारी करणाऱ्या क्रीडा पत्रकारांचा एक प्रकारे अपमानच होय. ‘एमओए’ आणि राज्य शासनाने अशा टाळता येण्याजोग्या चुकांमध्ये भविष्यात सुधारणा करायला हवी, एवढीच महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राची माफक अपेक्षा आहे.

कुठे झालाय ऑलिम्पिक दिनाचा कार्यक्रम?

दैनिक ‘सामना’ने काही ऑलिम्पियन खेळाडूंशी संपर्क साधला असता, ‘ऑलिम्पिक दिनानिमित्त असा कार्यक्रम झाल्याचेच आम्हाला माहीत नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सांगा, मग याहून दुर्दैव ते काय? काही वरिष्ठ ऑलिम्पियन खेळाडू म्हणाले, ‘आमचे ठीक आहे. मात्र स्वप्नील कुसाळे हा कितीतरी वर्षांनंतर ऑलिम्पिक पदक जिंकणारा महाराष्ट्रीयन खेळाडू ठरलाय. त्याला तरी बोलवायला हवे होते. या सर्वांनी नाव न छापण्याच्या अटीवर दैनिक ‘सामना’शी बोलताना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.