
केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेले जयपूरचे पायलट राजवीर सिंह चौहान यांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजवीर यांच्या तेराव्याच्या दिवशीच त्यांच्या आई विजयलक्ष्मी चौहान यांचेही निधन झाले. आपल्या तरुण मुलाच्या मृत्यूने खचलेल्या विजयलक्ष्मी तेराव्याच्या धार्मिक विधी पार पाडत होत्या, तेवढ्यात त्यांना छातीत अचानक दुखू लागले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना लगेच रुग्णालयात नेले, पण अर्ध्या वाटेतच चौहान यांनी प्राण सोडले.
राजवीरचे मित्र सूरज यांनी दिलेल्या माहितीनुसार राजवीरच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला होता. शनिवारी मोठ्या शोकाकूल वातावरणात राजवीर यांच्या तेराव्याच्या विधी सुरू होत्या. विजयलक्ष्मी त्या दिवशी पहाटे लवकर उठल्या आणि आमंत्रितांसाठी स्वतःच्या हाताने जेवन बनवत होत्या. त्याचवेळी बीकानेरहून काही नातेवाईक आले, ते पाहून त्या भावुक झाल्या आणि जोरजोराने रडू लागल्या. तेवढ्यात त्यांच्या छातीत तीव्र वेदना झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले गेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आपल्या तरुण मुलाचे अकालीच निधन झाले त्यामुळे विजयलक्ष्मी यांना हा धक्का सहन झाला नाही अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. सायंकाळी त्यांच्यावर चांदपोल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 15 जून रोजी केदारनाथमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता, त्यामध्ये जयपूरच्या शास्त्रीनगरचे रहिवासी पायलट राजवीर सिंहही होते.
राजवीर आर्मीमधून लेफ्टिनंट कर्नल पदावरून निवृत्त झाले होते, तर त्यांची पत्नी दीपिका चौहान सध्या लेफ्टिनंट कर्नल पदावर कार्यरत आहेत. मुलाच्या अंत्ययात्रेवेळी विजयलक्ष्मी यांनी “राजवीर अमर रहे” अशा घोषणाही दिल्या होत्या. आणि भावूक होऊन मुलाच्या फोटोला स्पर्श केला होता.