
>> प्रभाकर पवार
मध्य प्रदेशातील इंदूर हे शहर भिकारीमुक्त करण्यात आल्याने भोपाळमधील काही भिकाऱ्यांनी नागपूरमध्ये आश्रय घेतल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. भीक मागणे हा गुन्हा आहे. भीक मागणे प्रतिबंधक कायद्यानुसार भोपाळ पोलिसांनी भिकाऱ्यांवर कारवाई केली. इंदूरमध्ये पाच हजार भिकारी होते. आता इंदूरच्या रस्त्यावर तुम्हाला एकही भिकारी दिसणार नाही. महाराष्ट्राची राजधानी, भारताची अर्थवाहिनी व जगातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात इंदूरसारखे चित्र कधी दिसेल? नरिमन पॉइंट, कफ परेड, गेट वे ऑफ इंडिया आदी दक्षिण मुंबईतील परिसरात आपणास सहसा भिकारी दिसणार नाही. तेथे परदेशी पर्यटकांचा वावर असल्याकारणाने पोलीस परदेशी पर्यटकांकडे भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करतात. अटक करून कोर्टात हजर करतात. त्यानंतर त्यांची सुधारगृहात रवानगी केली जाते, परंतु उर्वरित मुंबईचे काय? कुठे भिकारी नाही, कुठल्याही ट्रॅफिक सिग्नलजवळ तृतीयपंथीय नाही, असा मुंबईतील ट्रॅफिक सिग्नल शोधावा लागतो.
मुंबईत लहान मुलांना भीक मागावयास लावणाऱ्या संघटित टोळ्या आहेत. हाजी अली नाक्यावर, दर्याच्या, मंदिराच्या ठिकाणी लहान मुलांना जबरदस्तीने उभे करून भीक मागावयास लावणाऱ्या टोळ्या मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी मध्यंतरी पकडल्या होत्या. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तरीही लहान मुलांना पुढे करून त्यांना भीक मागावयास लावले जाते. मुलांना आई-वडीलच भीक मागण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचेही पोलीस तपासात उघड झालेले आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील भिकाऱ्यांची वाढत असलेली संख्या हा एक चिंतेचा विषय आहे.
भिकाऱ्यांना पकडून त्यांना सुधारगृहात पाठविले जाते, परंतु भिकारी सुधारगृहात राहत नाहीत. पळून जातात किंवा त्यांची सुटका झाल्यावर ते पुन्हा भीक मागण्यासाठी रस्त्यांवर, ट्रॅफिक सिग्नलजवळ उभे राहतात.
मुंबईचे आयुक्त असताना राकेश मारिया यांची ट्रॅफिक सिग्नलजवळ एकदा गाडी थांबली तेव्हा एका लहान भिक्षेकरी मुलीने धाडस करून त्यांच्या गाडीच्या दरवाजाच्या काचेवर टक टक केले. पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना त्या मुलीकडे पाहून गहिवरून आले. त्या मुलीला ताब्यात घेऊन तिचे सुधारगृहात पाठवून पुनर्वसन करण्याचे आदेश आयुक्तांनी आपल्या सहकाऱ्यांना दिले. त्यानंतर भिकाऱ्यांविरुद्ध मोहीम काही महिने जोरदार चालली. त्यानंतर फुस्स । राकेश मारिया, विश्वास नांगरेपाटील बदलून गेल्यानंतर भिकाऱ्यांविरुद्धची कारवाई थंडावली. मुंबईत पुन्हा भिकारी वाढले. इंदूर भिकारीमुक्त करण्यात आल्याची बातमी वाचल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी मुंबई शहरातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भिकाऱ्याऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, वरिष्ठ निरीक्षक सारे कामाला लागले व गेल्या आठवडाभरात दोन हजारांच्या वर भिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. देवेन भारती यांनीही मुंबईतून भिकाऱ्यांना हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु तृतीयपंथीयांचे काय? तृतीयपंथीयांच्या झुंडीच्या झुंडी ट्रॅफिक सिग्नलजवळ अंगावर येतात. मुंबईची लोकल सेवा तर त्यांनाच आंदण देण्यात आली आहे, परंतु रेल्वे पोलीस किंवा जीआरपीवाले कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई करीत नाहीत.
महाविद्यालयीन विद्यार्थिनी जयबाला आशर (23) पहाटे 6 च्या सुमारास चर्चगेटहून बोरिवलीकडे निघालेल्या लोकलमधील महिलांच्या डब्यात चढली असता पैशांसाठी एका गर्दुल्याने तिची बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्याने त्या गर्दुल्याने जयबाला आशरला चालत्या लोकलमधून फेकून दिले. त्यात तिने आपले दोन्ही पाय गमावले. जयबाला आशर कायमची अपंग झाल्यावर रेल्वे पोलिसांनी पहाटे व रात्रीच्या वेळेस प्रत्येक लोकलमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. परंतु हे सारे देखावे आहेत. रेल्वेत गर्दुल्यांचा, भिकाऱ्यांचा व पाकीटमारांचा हैदोस सुरू आहे. रेल्वे पोलीस दलाचे महासंचालक म्हणून नव्यानेच सूत्रे हाती घेतलेले प्रशांत बुरडे हे याची गंभीर दखल घेतील, अशी अपेक्षा आहे.
पूर्वी भीक हा देण्याचा प्रकार होता. आता त्यात बदल झाला आहे. आता भीक किती पाहिजे हे भिकारी ठरवितात. भिकाऱ्यांना त्यांच्या मनासारखे पैसे मिळाले नाहीत तर तेच पैसे ते देणाऱ्याच्या अंगावर फेकतात. असे मुजोर भिकारी श्रीमंत झाले आहेत. बरेच भिकारी भीक मागून श्रीमंत झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. रोज किमान दोन ते तीन हजार रुपये कमावणारे भिकारी मुंबई शहरात आहेत. भीक मागणाऱ्यांचे रॅकेट मुंबईत जसे आहे तसेच इतर शहरांतही आहे. बरेच भिकारी भीक स्वीकारण्यासाठी ‘गुगल पे’सारख्या डिजिटल पेमेंट अॅप्सचाही वापर करीत आहेत. गुवाहाटीमधील एक अंध भिकारी गळ्यात Phone pe QR कोड बांधून लोकांना पैसे देण्यास सांगतो. असे सर्वत्र सुरू आहे. आपल्या देशाचे, महाराष्ट्राचे शहरी भाग भिकाऱ्यांनी व्यापले आहेत.
भोपाळ पोलिसांनी पाच हजार भिकाऱ्यांना हद्दपार करून इंदूर साफ केले त्यापैकी बऱ्याच भिकाऱ्यांचे शासनाने नोकऱ्या देऊन पुनर्वसन केले आहे. काही भिकाऱ्यांनी नागपूर शहरात आसरा घेतला आहे. काहींनी मुंबईची वाट धरली आहे. त्यामुळेच मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी भिकाऱ्यांविरुद्ध तीव्र मोहीम उभारून मुंबई साफ करण्याचे ठरविले आहे. तर भीक मागणाऱ्या लहान मुलांचा शोध घेऊन त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न राज्याचा महिला व कल्याण विभाग करीत आहे. असो. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नागपूरसारख्या शहरांत भीक मागणाऱ्या मुलांचे पुनर्वसन होणार असेल तर ते स्वागतार्ह आहे.