मंत्रालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या दिव्यांगांवर सरकारची दडपशाही; पोलिसांच्या धक्काबुक्कीत महिला बेशुद्ध, कपडे फाटले

शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी मंत्रालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या दिव्यांगांवर आज महायुती सरकारच्या पोलिसांनी जुलूम केले. आंदोलनकर्त्यांना पकडण्याच्या निमित्ताने पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीत आंदोलक महिलांचे कपडे फाटले गेले तसेच एक महिला चक्कर येऊन कोसळली. त्यानंतरही पोलिसांनी दयामाया न दाखवता जबरदस्ती गाडीत बसवून पोलीस ठाण्यात नेले, असा आरोप आंदोलकांनी केला.

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्याला पाठिंबा म्हणून संघटनेचे कार्यकर्ते ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. आज दुपारी 2 च्या सुमारास प्रहार जनशक्ती पार्टी आणि त्याच अंतर्गत कार्य करणाऱ्या प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन केले. ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या’, ‘शेतमालाला हमीभाव द्या’, ‘दिव्यांग व विधवा महिलांना मासिक सहा हजार रुपये मानधन द्या’, ‘ग्रामीण भागांतील घरकुल योजना लाभार्थ्यांना पाच लाख रुपये अनुदान द्या’ अशा जोरदार घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या तसेच इतर विविध मागण्यांचे फलकही झळकावले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यावेळी पोलिसांनी पक्षाचे प्रवक्ते अॅड. मनोज टेकाडे व अन्य पदाधिकाऱयांना ताब्यात घेतले.

दडपशाहीचा तीव्र निषेध

लोकशाहीनेच आंदोलनाचा अधिकार दिला आहे. परंतु आमचे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी दडपशाही केली. पोलिसांनी निष्काळजीपणे आंदोलन हाताळल्याने एका दिव्यांग आंदोलक महिलेचे कपडे फाटले गेले तर अन्य एक महिला बेशुद्ध पडली. सरकार आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा आम्ही तीव्र निषेध करतो. z अॅड. मनोज टेकाडे, प्रवक्ते, प्रहार जनशक्ती पार्टी