
राज्याच्या सार्वजनिक विभागातील कर्मचाऱयांचे रखडलेले पगार अखेर होण्यास सुरुवात झाली आहे. याबाबचे वृत्त दै. ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाले होते. सरकारने या वृत्ताची त्वरित दखल घेतली आणि ‘मंजूर पदांचा ताळमेळ’ त्वरित घेण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यातल्या ‘सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱयांचे पगार रखडले. पदांचा ताळमेळ नसल्याच्या नावाखाली पगार काढले नाहीत’ असे वृत्त दै. ‘सामना’मध्ये 20 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची सरकारने तातडीने दखल घेतली आणि पगार होण्यास सुरुवात झाली आहे.
पत्रकात काय म्हटले आहे
सार्वजनिक बांधकाम विभागातील क्षेत्रीय कार्यालयांकडून प्रस्ताव शासनास प्राप्त होत आहेत. त्यानुसार जवळपास 475 आहरण व संवितरण अधिकाऱयांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. उर्वरित क्षेत्रीय कार्यालयांकडून जसजसे प्रस्ताव होतील त्यानुसार तपासणी करून प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांच्या सेवार्थ प्रणालीतील पदांचा ताळमेळ घालण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची व वेतन देयके स्वीकारण्याची विनंती वित्त विभागास करण्यात आली आहे. त्यामुळे पगार रखडणार नाहीत.



























































