
रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत 25 मे रोजी झालेल्या तिहेरी खून प्रकरणाचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. हा खून महिलेच्या नातेवाईकानेच अनैतिक संबंधांतून केला असल्याचे उघड झाले आहे. आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सहा वेगवेगळ्या पथकांनी राज्यभर केलेल्या तपासानंतर मृत महिलेची ओळख पटवून हा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.
स्वाती केशव सोनवणे (वय – 25, रा. माजलगाव, जि. बीड), स्वराज (वय 3 वर्षे) आणि विराज (वय 1 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. तर, गोरख पोपट बोखारे (वय – 36, रा. सरदवाडी, शिरूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 25 मे रोजी रांजणगाव परिसरातील खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक महिला आणि दोन लहान मुलांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटवून आरोपीला अटक करण्याचे आव्हान होते.
मात्र, ओळख पटविण्यासाठी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत 28 अंमलदारांची सहा पथके पाठविण्यात आली होती. या पथकांनी प्रत्येक जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली, तेव्हा बीडमधील माजलगाव पोलीस ठाण्यात एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने दिल्याचे आढळले. मृत महिलेचे वर्णन मृत महिलेशी जुळत होते. पतीकडे चौकशी केल्यावर ती आळंदी येथे आई-वडिलांकडे गेल्याचे समजले. आळंदीत चौकशी केली असता, ती गोरख याच्याबरोबर गेली असल्याची माहिती मिळाली. स्वाती ही आरोपी गोरखच्या चुलत मामाची मुलगी आहे.
स्वाती आणि तिच्या नवऱ्यामध्ये नेहमी भांडणे होत असत. हे वाद नेहमी गोरख सोडवत होता. यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. चारच महिन्यांपूर्वी गोरखने त्यांच्यातील वाद मिटवला होता. दरम्यान, स्वाती आळंदीला आल्यावर तिने गोरखकडे विवाहाचा तगादा लावला. यामुळे वाद झाल्यावर गोरख तिला आणि तिच्या दोन्ही मुलांना दुचाकीवर घेऊन 23 मे रोजी रात्री खंडाळे गावाकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर घेऊन आला. तेथे पुन्हा त्यांच्यात वाद झाले.
दरम्यान, दोन्ही मुले झोपली असताना त्याने स्वातीचा गळा आवळला आणि डोक्यात दगड घालून खून केला. त्यावेळी झोपेतून उठलेल्या मुलांचाही गळा आवळून खून केला. मृतदेहांची ओळख पटू नये म्हणून त्याने एका पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणून तिघांच्याही मृतदेहांवर टाकून त्यांना आग लावली व तेथून पळाला. घटनेनंतर नेहमीप्रमाणे तो रांजणगाव येथील एका कंपनीतील गाडीवर चालक म्हणून काम करत राहिला. मात्र, पोलिसांनी शिताफीने तपास करून त्याला ताब्यात घेतले. त्याला शिरूर न्यायालयात हजर केले. ११ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.