नितेश राणे यांच्यामुळे महाराष्ट्र बरबाद होतोय

राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे मुस्लिम समाजाबद्दल सातत्याने वादग्रस्त विधाने करून दोन समाजांत सामाजिक तेढ निर्माण करत आहेत. मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात ते महाराष्ट्र बरबाद करतायत, असे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन नितेश राणे जे काही बोलतात ते महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुफी कॉरिडॉर बनवण्याचे काम हाती घेऊन देशाला एकतेचा संदेश देत आहेत. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकोपा राहावा याचे प्रयत्न मोदी आणि फडणवीस सरकार करीत असताना नितेश राणे वातावरण कलुषित करीत आहेत. आम्ही सर्व हिंदुस्थानी मुस्लिम आहोत, असे प्यारे खान नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अल्पसंख्याक आयोग नोटीस पाठवणार

गोवंशबंदी आणि कुर्बानी यावरून मंत्री नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. आपण यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणे यांना अल्पसंख्याक आयोगामार्फत नोटीस पाठवणार असल्याचे प्यारे खान यांनी स्पष्ट केले.