संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधी झाली आहे. अशा वेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा आणि पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करा असे आवाहन केले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या दहशतवाही तळांवर हल्ले केले होते. त्यानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता. आता दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे आणि पहलगाम हल्ला, ऑपरेशि सिंदूर, हिंदुस्थान – पाकिस्तान संघर्षात अमेरिकेची भूमिका यावर चर्चा करावी असे आवाहन मल्लिकार्जून खरगे आणि राहुल गांधी यांनी केले आहे.

काँग्रेस नेते सचिन पायलट यांनीही असे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. पायलट म्हणाले की संसदेचे विशेष अधिवेशन आणि सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे. या अधिवेशनाला आणि बैठकीला पंतप्रधान मोदींनी हजर रहावे. या अधिवेशनात आणि बैठकीत हिंदुस्थान पाकिस्तान दरम्यान झालेल्या सर्व घडामोडींवर चर्चा करावी अशी मागणीही पायलट यांनी केली.