गरिबांची गणनाच नाही त्यामुळे जबाबदारी देखील नाही, हेच तर भाजप मॉडेल; राहुल गांधींची टीका

प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीत 37 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला होता. मात्र बीबीसीने दिलेल्या रिपोर्टनुसार या चेंगराचेंगरीत 82 भाविकांचा मृत्यू झाला आहे. त्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावरून केंद्रातील भाजप सरकारला फटाकारले आहे.

”बीबीसीच्या रिपोर्टनुसार महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा लपवण्यात आला आहे. कोविडमध्ये गरिबांचे मृतदेह आकड्यांच्या खाली दबवले गेले. जसे मोठ्या रेल्वे अपघातांचे सत्य दाबले गेले. हेच ते भाजप मॉडेल आङे. गरिबांची गणना नाही, त्यामुळे जबाबदारी पण नाही”, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीदरम्यान 4 हजार हेक्टर क्षेत्रात महाकुंभमेळा आयोजित करण्यात आला होता. बीबीसीच्या पडताळणीत 50 हून अधिक जिल्ह्यांतील 100 पेक्षा जास्त कुटुंबांनी आपल्या नातेवाइकांचा मृत्यू चेंगराचेंगरीत झाल्याचे सांगितले. किमान चार ठिकाणी जीवघेणी चेंगराचेंगरी झाल्याचे पुरावे मिळाले असल्याचं बीबीसीने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने अद्याप मृतांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही.