Ratnagiri News – गॅस टर्मिनलच्या कामासाठी 19 वर्षांआधीचा दाखवला ना-हरकत दाखला, जिंदाल कंपनीची बनवाबनवी ग्रामस्थांनी हाणून पाडली

नांदिवडे येथे LPG गॅस टर्मिनल उभारण्यापूर्वी जिंदाल कंपनीने नांदिवडे ग्रामपंचायतीचा ना-हरकत दाखला घेतला नसल्याचे उघड झालं आहे. जिंदाल कंपनीने पुन्हा एकदा बनवाबनवी करत नांदिवडे ग्रामपंचायतीने 2006 साली ना-हरकत दाखला दिल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी जिंदाल कंपनीची ही बनवाबनवी उघडकीस आणली आणि 2006 साली ग्रामपंचायतीने दिलेला ना-हरकत दाखला हा फक्त औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आणि बारमाही बंदर याकरिता दिला असल्याच ठणकावून सांगितलं. 19 डिसेंबर 2024 रोजी नांदिवडे ग्रामपंचायतीने विशेष सभा घेऊन नांदिवडेत होत असलेला घातक आणि विनाशकारी प्रकल्प थांबविण्याबाबत ठराव मंजूर केला असल्याचे सांगून ठरावाची प्रत अध्यक्षांकडे सुपूर्द केल्यामुळे जिंदाल कंपनीला दणका बसला आहे.

नांदिवडे येथील लोकवस्तीत जिंदाल कंपनी गॅस टर्मिनल उभारत आहे. या गॅस टर्मिनलला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाने या प्रकल्पाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने गॅस टर्मिनल उभारण्यासाठी आवश्यक परवानगी घेतली नसल्याचा ठपका ठेवत गॅस टर्मिनलच्या कामाला स्थगिती दिली होती. त्यानंतर जिंदाल कंपनीने पुन्हा काम सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ग्रामस्थांनी काम बंद पाडले. नांदिवडे येथील गॅस टर्मिनल संदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने जयगड येथे एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ.संदीप भुजबळ, बंदर अधीक्षक शेखर वेंगुर्लेकर, बंदर निरीक्षक शंकर महानवर, जिंदाल कंपनीचे अधिकारी सचिन गबाळे, सुदेश मोरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील. प्रहार दिव्यांग संस्थेच्या अध्यक्षा काजल नाईक, माजी सरपंच गुरूनाथ सुर्वे, अनिरुद्ध साळवी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांनी नांदिवडे येथे जिंदाल कंपनी उभारत असलेल्या गॅस टर्मिनल आणि केमिकल टॅकेज फॅसिलिटी या प्रकल्पांना विरोध करत गॅस टर्मिनल उभारण्यासाठी जिंदाल कंपनीने नांदिवडे ग्रामपंचायतीचा ना-हरकती दाखला घेतला नसल्याचा आरोप केला. त्या विषयावर जिंदाल कंपनीने 2006 साली नांदिवडे ग्रामपंचायतीने ना-हरकत दाखला दिल्याचे सांगितले. जिंदाल कंपनीची ही बनवाबनवी काही क्षणात ग्रामस्थांनी उघडकीस आणली. 19 डिसेंबर 2024 रोजी गॅस टर्मिनलला विरोध करत काम थांबवण्याबाबतच्या ठरावाची प्रतच अध्यक्षांच्या हाती दिल्याने जिंदाल कंपनीचा खोटेपणा उघड पडला.

काम बंद आहे मग यंत्रसामुग्री कशाला?

जिंदाल कंपनी उभारत असलेल्या गॅस टर्मिनलचे काम बंद ठेवण्याचा मेरीटाईम बोर्डाचा आदेश असताना प्रकल्पाच्या ठिकाणी यंत्रसामुग्री का ठेवली आहे? असा सवाल करत ती यंत्रसामुग्री हटविण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. जिंदाल कंपनीने प्रकल्पस्थळी बांधलेल्या भिंतीमुळे ग्रामस्थांच्या घरामध्ये आणि रस्त्यावर पाणी येत आहे. त्यामुळे ती भिंत तोडून टाकावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. काम बंदच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जिंदाल कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ॲड.स्वप्नील पाटील यांनी केली.