मुंबई ते नागपूर अवघ्या आठ तासांत, ‘समृद्धी’च्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या लोकार्पणानंतर संपूर्ण 701 किलोमीटरचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. या महामार्गावरून मुंबईहून नागपूर अवघ्या आठ तासांत गाठता येणार आहे.

11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृध्दी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले होते. आज शेवटचा चौथा टप्पा सुरू झाला. इगतपुरी ते आमणे टप्पा सुरू झाल्याने इगतपुरी ते कसारा घाट अवघ्या आठ मिनिटांत पार करता येणार आहे. याआधी मुंबईहून नाशिकला जाताना पूर्वी चार तासांपेक्षा अधिक वेळ लागत होता. ते अंतर आता समृद्धी महामार्गामुळे 2 तास 30 मिनिटांत पार करता येणार आहे.

इगतपुरी-आमणे टप्प्याची वैशिष्टय़े

– एकूण पाच बोगदे, समृद्धी महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा आठ किलोमीटरचा बोगदा नाशिक जिह्यातील इगतपुरीपासून सुरू होतो.
– प्रत्येक 90 मीटर अंतरावर अग्निरोधक यंत्रणा
– डेन्मार्कचे अद्ययावत तंत्रज्ञान, बोगद्यात तापमान 60 डिग्रीच्या वर गेल्यास पाण्याचे फवारे सोडणारे स्प्रिंकल्स आपोआप चालू होतात आणि तापमान कमी झाल्यावर आपोआप बंद होतात.
– बोगद्यात 24 मीटर लांबीचे एकूण 286 झोन
– दोन्ही टनेल मिळून एकूण 572 झोन
– बोगद्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी एकूण 100 डबल अॅक्सल रिव्हर्सेबल व्हेंटिलेशन फॅन्स, वाहनांमधून निर्माण होणारा धूरही बाहेर फेकला जातो
– महामार्गालगत गॅस पाईपलाईन, उद्योगांना गॅस पुरवणार

फडणवीसांच्या गाडीचे स्टिअरिंग शिंदेंच्या हाती

लोकार्पणानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी महामार्गावरील बोगद्यातून प्रवास केला. यावेळी फडणवीस यांच्या ऑडी गाडीचे स्टिअरिंग शिंदे यांच्या हाती होते. यापूर्वीच्या टप्प्याच्या लोकार्पणावेळी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांची गाडी फडणवीस यांनी चालवली होती. यावेळी शिंदे सारथी बनले होते, बाजूला फडणवीस बसले होते आणि अजित पवार मागच्या सीटवर बसले होते.

‘समृद्धी’ची वैशिष्टय़े
z एकूण 61 हजार कोटी रुपये खर्च
z 12 कोटी सिमेंट पोत्यांचा वापर
z 7 लाख मेट्रिक टन स्टीलचा उपयोग
गाडी छान चाललीय, तिघे तीन शिफ्टमध्ये चालवतो!

फडणवीसांची मिश्कील टिप्पणी
समृद्धी महामार्गावरून प्रवास केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. आमची गाडी एकदम छान चालली आहे. तिघेही तीन शिफ्टमध्ये गाडी चालवतो, अशी मिश्कील टिप्पणी फडणवीस यांनी यावेळी केली. आम्ही तिघेही एकत्र गाडी चालवत आहोत. काही काळजी करु नका. आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची सवय आहे, असे ते म्हणाले. समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासासाठी समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल, असा विश्वासही त्यांनी समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना व्यक्त केला.