ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भात काही डोमकावळे कावकाव करत आहेत, संजय राऊत यांचा टोला

या सरकारनं महाराष्ट्रामध्ये सर्वच स्तरावर आणिबाणी लादलेली आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच मराठीसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भात काही डोमकावळे कावकाव करत आहेत असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, राज्य सरकारच्या अध्यादेशाची होळी करून या आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे. आम्ही या मध्ये सगळ्यांनाच आमंत्रित केलं आहे. हा आंदोलनाचा आज पहिला टप्पा असून महाराष्ट्रावर शालेय शिक्षणात जी हिंदी सक्ती लादली जाते आहे त्या आंदोलनाचा आजचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारन हिंदी सक्तीचा जो अध्यादेश काढलेला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या अध्यादेशाची होळी करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वा संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका स्तरावर या अध्यादेशाची होळी करण्यात येणार आहे. आणि यात फक्त शिवसैनिकचं सामील नाही आहेत. तर आम्ही त्या त्या जिल्ह्यातली मराठी जनता, साहित्यिक, लेखक यांनाही आमंत्रित केलं आहे. आज तीन वाजता आझाद मैदानावर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या अध्यादेशाच्या होळी करतील. त्यानंतर पाच तारखेला याच विषयासंबंधित एकत्रित मोर्चा होईल या मोर्च्याची सुद्धा तयारी जोरात सुरू आहे. या मोर्चासाठी शिवसेना शाखाप्रमुखांची शिवसेना भवनात तातडीने बैठक बोलावण्यात आली आहे असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

मराठी माणसाची एकजूट मराठी द्वेष्ट्यांना दिसावी आणि मराठी मन आणि मराठी मनगट हे धगधगतंय या सक्तीविरोधात हे आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या महाराष्ट्रातल्या महाराष्टद्रोही हस्तकांना दाखवल्या शिवाय राहणार नाही. आज आम्ही अध्यादेश जाळू उद्या अधिवेशन आहे. उद्या अधिवेशनातही हा प्रश्न चर्चेला आणला जाईल. लोकशाही मार्गाने चर्चा सरकारने होऊ दिली तर. हे सरकार लोकशाहीवादी नाही, या सरकारनं महाराष्ट्रामध्ये सर्वच स्तरावर आणिबाणी लादलेली आहे. मग ती भाषिक आणीबाणी असेल, विरोध दडपण्याची आणीबाणी असेल किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल. हे सगळे विषय उद्या अधिवेशनात घेतले जातील अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

आम्ही उदय सामंत यांच्याकडे काय भविष्य विचारलेलं नाही. माझी किती भाकितं खरी झाली, तीन वर्षांपूर्वी ते मंत्री कसे झाले हे त्यांना पक्क माहित आहे. त्यामुळे हा प्रश्न भाकिताचा नसून राजकीय आकलनाचा आहे. मिंध गटात जे लोक गेले बालबुद्धीचे लोक आहेत. जशी हिंदीची सक्ती होते तशी त्यांच्यावर पक्ष सोडण्याची सक्ती मोदी आणि शहांनी केली आणि त्या सक्तीविरुद्ध ते स्वाभिमानाने उभे राहिले नाहीत आम्ही हिंदी विरोधात स्वाभिमानाने उभे राहिलो आहेत.

प्रश्न असा आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येतो तर या लोकांच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. तुम्ही महाराष्ट्रद्वेषापोटी एकत्र आलेला आहात, आम्ही मराठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येतोय. त्याच्यामुळे रावणांना रामराज्याचा तिटकारा येणारच. उदय सामंतानी कमीत कमी बोलावं, त्यात त्यांच हित आहे. हा डांबराच्या व्यवहार नाहीये मराठी भाषेचा विषय आहे.

ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भात काही आता डोमकावळे कावकाव करतात त्यांचा संबंधच नाही आणि जर या मोर्च्यामुळे हिंदी सक्ती सरकार रद्द करणार असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू. हिंदी सक्तीचा विरोध ही महाराष्ट्राची भूमिका आहे. साडे अकरा कोटी मराठी जनतेने एका आवाजात सांगितलेल आहे की आम्हाला ही सक्ती मान्य नाही, आणि मराठी जनतेची ही लोकभावना आहे, ही बाब सरकार स्वीकारणार असेल आणि त्याच्यावरती काही निर्णय घेणार असेल तर नक्कीच आम्ही त्यांच स्वागत करू. शेवटी लोकभावनेपुढे सरकारला झुकावं लागतं असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.