
ईडीने बेकायदेशीररित्या तुरुंगात टाकलेले असताना 100 दिवसात आलेल्या अनुभवांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांचे ‘नरकातील स्वर्ग’ हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या संपल्या आहेत. या पुस्तकाची मागणी वाढत असतानाच खुद्द संजय राऊत यांनीही राज्यातील विविध नेत्यांना आपल्या पुस्तकाची प्रत पाठवली आहे. आता संजय राऊत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनाही ही प्रत पाठवली आहे. राऊत यांनी स्वत: आपल्या अधिकृत एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली.
आदरणीय सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांना “नरकातला स्वर्ग“ची प्रत आज पाठवली. संघ परिवारातील अनेक मित्रांनी पुस्तक वाचून अभिप्राय कळवले आहेत. मी त्यांचा आभारी आहे, असे संजय राऊत यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. या पुस्तकाच्या प्रतिसोबत राऊत यांनी भागवत यांना एक पत्रही पाठवले आहे.
‘सोबत ‘नरकातला स्वर्ग’ या माझ्या पुस्तकाची प्रत आपल्या अवलोकनासाठी पाठवत आहे. देशातील लोकशाहीविरोधी राज्यकर्त्यांनी मला खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकले. माझा व माझ्या कुटुंबियांचा छळ केला. माझी कायदेशीर मार्गाने सुटका होऊ नये म्हणून न्याय यंत्रणेवरही दबाव आणला. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी हा अत्याचार उघडपणे होत असताना सगळेच गप्प राहिले. 1975 च्या आणीबाणी पर्वात हेच घडले व त्याविरुध्द संघ परिवाराने संघर्ष केल्याचे सांगितले जाते. माझ्या लेखनात अलीकडच्या काळातले अंधार युग चित्रित झाले आहे. आपल्याला लेखनाचा हा प्रयत्न नक्कीच आवडेल’, असे या पत्रामध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आदरणीय सरसंघचालक
श्री.मोहन भागवत यांना “नरकातला स्वर्ग “ ची प्रत आज पाठवली.
संघ परिवारातील अनेक मित्रांनी पुस्तक वाचून अभिप्राय कळवले आहेत,मी त्यांचा आभारी आहे.
@friendsofrss pic.twitter.com/FJC0lXi6cV— Sanjay Raut (@rautsanjay61) June 7, 2025