
निवडणुकीत वाद होतातच, म्हणून काय गुन्हा दाखल करणार का, असा उफराटा सवाल करीत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बोगस मतदाराला पळवल्याचे समर्थनच केले. त्या तरुणाने विनंती केली म्हणून आपल्या मुलाने त्याला वाचवल्याचा दावाही त्यांनी केला.
नगर परिषद निवडणुकीसाठी बोगस मतदान करताना जागरूक नागरिकांनी एका तरुणाला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. मात्र आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल आणि त्याचा साथीदार श्रीकांत या दोघांनी त्याला पोलिसांच्या ताब्यातून पळवून नेले. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यामुळे संतप्त झालेल्या आमदार गायकवाड यांनी ‘हे बुलढाणा आहे का बिहार ?’ असा प्रश्न केला. मतदार याद्यांमध्ये घोळ होता. मतदारांना एका केंद्रावरून दुसऱया केंद्रावर पाठवण्यात येत होते. त्यामुळे वाद झाला. ज्या तरुणाला पकडले त्याने विनंती केली. त्यामुळे माझ्या मुलाने त्याला वाचवले, असा दावा आमदार गायकवाड यांनी केला.






























































