महायुती…क्या हुआ तेरा वादा? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना आक्रमक, 5 ते 12 जूनदरम्यान मराठवाडय़ात तीव्र जनआंदोलन

महायुतीने सत्तेच्या लोभापायी निवडणुकीपूर्वी  शेतकऱ्यांना अनेक प्रलोभने दाखवत घोषणांचा पाऊस पाडला होता, मात्र सत्तेत आल्यावर सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाली असून सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी मराठवाडय़ात शेतकऱ्यांचे तीव्र जनआंदोलन उभारण्यात येणार आहे.

5 ते 12 जून या कालावधीत हे आंदोलन उभारले जाणार आहे. सरकारला ‘क्या हुआ तेरा वादा?’ या शिर्षकाखाली जाब विचारून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी आज मुंबईत शिवसेना भवन येथे शिवसेना नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडय़ातील नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आदींची बैठक पार पडली.

या बैठकीला शिवसेना नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते विश्वनाथ नेरुरकर, संपर्कप्रमुख व उपनेते विनोद घोसाळकर, आमदार पैलास पाटील यांनी मार्गदर्शन केले.