
लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, ते पाळण्या आले नाही. त्यामुळे तेथील Gen Z ना रस्त्यावर उतरत आंदोलन करावे लागले, असे शिवसेना (उद्धव बाळासेहब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. सरकारला देशाचा सीमाभाग शांत ठेवता येत नसेल, तर ते सरकारचे अपयश आहे, असा घणाघात त्यांनी केला. तसेच शेजारी चीन असून तो लडाखमध्ये घसखोरी करत आहे, हे विश्वगुरुंना कोणातरी सांगण्याची गरज आहे, असे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला.
लडाख-लेह हा देशाच्या सीमेवरचा भाग आहे. जर सीमाभागातील लोकांच्या मागण्या मान्य करता येत नसतील, सीमाभाग यांना शांत ठेवता येत नसेल, तर ते स्वतःला विश्वगुरू कसे म्हणवतात. जनतेला दिलेली आश्वासने मोदी यांनी पाळली नाहीत. कलम 370 हटवल्यानंतर लेह लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली होती. अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली होती, ही वेळ देशावर का आली, याचा विश्वगुरुंनी विचार करण्याची गरज आहे.
आश्वासने पूर्ण केली नसल्याच्या विरोधात Gen Z रस्तायवर उतरले आहेत आणि भाजपवाले पळून गेले. तिथे आंदोलनावर बंदी घालण्यात आली आहे. हिंदुस्थानच्या या सीमाभागाजवळ चीन आहे आणि चीन लडाखमध्ये घुसला आहे, याकडे विश्वगुरुंनी लक्ष द्यावे. देशाच्या सीमाभागातील राज्य शांत ठेवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सोनम वांगचूक यांच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता या भागासाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी तब्बल 16 दिवस उपोषण केले आहे. मात्र, सरकारकडून कोणीही तिथे जायला तयार नाही, हा निर्दयीपणा आहे. अनेक राज्यात सरकारविरोधात असंतोष आहे. जनतेचा असंतोष उफाळून आला तर यात काय चुकले? ही लोकशाही आहे, त्यांच्या अत्याचार, भ्रष्टाचार, दडपशाही, दरोडेखोरी सहन का करायचे? असा सवालही त्यांनी केला. लेड लखाडच्या जनतेच्या मागण्यांना देशातील जनतेचा पाठिंबा आहे, असेही त्यांनी परखडपणे सांगितले.



























































