जनतेच्या पैशाने उभारलेल्या समृद्धीवर लालपरीला मात्र बंदी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग पूर्णपणे सुरू झाला आहे. महायुती सरकारने त्याचा मोठा गाजावाजा केला. पण जनतेच्या पैशाने उभारल्या गेलेल्या या महामार्गावर सर्वसामान्यांच्या लालपरीला मात्र मनाई करण्यात आली आहे. एसटी बसेसना समृद्धीवर प्रवेश नसल्याने सामान्य जनतेला या महामार्गाचा काहीच फायदा होणार नाही.

‘मुंबई ते नागपूर’ समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे. त्यावरून आठ तासांत मुंबई-नागपूर प्रवास केला जाऊ शकतो. परंतु त्या प्रवासाचा लाभ फक्त महागडय़ा गाडय़ांमधून फिरणाऱया श्रीमंतांनाच होणार आहे. कारण या महामार्गावर एसटीसारख्या सार्वजनिक वाहनांना प्रवेश नाही. मुंबईतील ‘अटल सेतू’ आणि ‘किनारा रस्ता’ यावरसुद्धा सार्वजनिक वाहनांना प्रवेश दिला गेलेला नाही.

एसटी बसेसना समृद्धीवर परवानगी द्या

समृद्धी महामार्गावर एसटी बसेसना परवानगी द्यावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. ‘समृद्धी’ महामार्ग सार्वजनिक निधीतून बनलेला आहे त्यामुळे तो सामान्य नागरिकांना वापरता आला पाहिजे. एसटी बसेसना समृद्धीवर प्रवेश देण्यात यावा आणि त्यांना टोलमाफीही दिली जावी, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.