
एसटी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी महायुती सरकारने केलेल्या घोषणा निव्वळ धूळफेक आहे, असा दावा करीत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने सरकारच्या फसव्या योजनांची पोलखोल केली आहे. सरकारने केवळ हक्क हिरावून घेतलेल्या महागाई भत्त्यात वाढ केली. मात्र अनपेक्षित निर्णय घेण्याचे धाडस दाखवले नाही, अशी टीका एसटी कामगार सेनेने केली आहे.
एसटी महामंडळाच्या सर्व संघटनांची बैठक मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. यावेळी सरकारने मोठमोठय़ा घोषणा केल्या. त्या घोषणा पोकळ असल्याचे एसटी कामगार सेनेने निदर्शनास आणले आहे. महागाई भत्त्यात 46 टक्क्यांवरून 53 टक्क्यांपर्यंत वाढ लागू केली. तीदेखील जुलै 2025 च्या पगारातून केली आहे. चालू महिन्याच्या पगारापासून वाढ लागू केलेली नाही. तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंदराव दिघे वैद्यकीय परिपूर्ती योजना या दोन्ही योजना सामान्य जनतेलादेखील लागू आहेत. वास्तवात एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवीन कोणतीही योजना लागू केलेली नाही. या योजनेला कॅशलेस योजना म्हणून नामकरण करून एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी केला आहे. इतर योजनांच्या घोषणांमध्ये अशाच प्रकारे झोल करण्यात आल्याचे एसटी कामगार सेनेने म्हटले आहे. सेवानिवृत्त एसटी कर्मचा-यांना आधीच 9 महिन्यांचा मोफत पास मिळत होता. यात फक्त तीन महिन्यांची वाढ करून 12 महिने करण्यात आले. तेही केवळ लालपरी बस करीता. शिवशाही, शिवनेरी, व्हॉल्वो, निमआराम, शयनयान या बसने सेवानिवृत्त कर्मचारी प्रवास करु शकणार नाही, याकडेही लक्ष वेधले आहे.